पंतप्रधान मोदींचे कार्यक्रमात प्रतिपादन, मध्यरात्री केली रेल्वेस्थानकाची पाहणी
@ वाराणसी / वृत्तसंस्था
गेल्या सात वर्षांमध्ये वाराणसी शहराचा जो विकास झाला तो साऱया देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते वाराणसीत ‘स्वर्वेद महामंदिर धाम’ येथे आयोजित विहंगम योग संस्थेच्या 98 व्या वार्षिकोत्सवात भाषण करीत होते. त्यांनी भाषणात अनेक मुद्दय़ांचा उल्लेख केला.गीता जयंती दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन होते.
ज्यावेळी आपल्या देशावर संकटे येतात तेव्हा कोणीना कोणी महात्मा, संत, विभुती अवतरीत होतात आणि संकटाचे निवारण करतात, ही भारताची विशेषता आहे, असे विचार प्रकट करत त्यांनी महात्मा गांधींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रमात साधुसंतांनीही महत्वाची भूमिका साकारली होती. नव्या पिढय़ांना त्यांचे योगदान समजून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विहंगम योग संस्था या प्रयत्नांमध्ये अग्रभागी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकासाचा मुद्दा महत्वाचा
गेल्या सात वर्षांमध्ये देशाचा मोठा विकास झाला. त्यापूर्वीच्या अनेक दशकांमध्ये जी कामे झाली नव्हती, ती या अल्प कालावधीत करण्यात आली. वाराणसी शहर हे आता विकासकामांमध्ये आघाडी घेत असून या शहराचा विकास देशासाठी आदर्श ठरणार आहे. अनेक प्रसंगात वाराणसी शहराने देशाला मार्गदर्शन केले आहे. अतिशय कठीण प्रसंगीही या शहराने भारताची विशेष ओळख कायम राखली. तसेच ती संवर्धित केली. या शहराने संकटाच्या काळातही कला, संस्कृती आणि उद्योजगकता यांचे संरक्षण आणि संवर्धन केले, असा गौरव त्यांनी केला.
12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
सोमवारी काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रात्री उशीरा भाजप आणि सहकारी पक्षांची सरकारे असणाऱया 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक वाराणसी येथे घेतली. प्रत्येक राज्यातील केंद्रीय योजनांचे काम कसे चालले आहे, याची माहीती त्यांनी घेतली. या योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, गुजरात, हरियाणा, गोवा, बिहार, नागालँड आणि अरुणचल प्रदेशचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. कर्नाटकात अधिवेशन असल्याने या राज्याचे मुख्यमंत्र अनुपस्थित होते.
मध्यरात्री रेल्वेस्थानकाची पाहणी
सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी रेल्वेस्थानकाला अचानक भेट दिली. तसेच शहरातील अनेक विकासकामांची पाहणी पायी चालत केली. या ऐतिहासिक शहरासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेते होते.