लहानपणी ‘श्रावणातल्या कहाण्या’ ऐकल्या आणि वाचल्या होत्या. अनेक कहाण्यांमध्ये रात्रीच्या वेळी शंकर-पार्वती विमानातून विहार करीत असताना त्यांना एखाद्या भक्ताचे रडणे ऐकू येते. ते खाली उतरतात आणि भक्ताचे दु:ख समजून घेतात. दु:ख दूर करतात किंवा त्यासाठी मार्ग दाखवतात. त्या काळी अशा कहाण्यांनी स्त्रियांना खूप मोठा मानसिक आधार दिला असेल. या विसाव्या शतकात शंकर-पार्वती पुन्हा आकाशातून विहार करू लागले तर त्यांना काय दिसेल? ते काय म्हणतील? एक काल्पनिक संवाद…
“महादेवा, खाली सर्वत्र हलकल्लोळ माजलेला दिसतो आहे. गावात सगळीकडे मृत्युनं थैमान घातलं आहे.’’
“होय, जगभर सगळीकडे कोरोना नावाचा राक्षस धुमाकूळ घालतोय.’’ “आपण माणसांसाठी काही करू शकत नाही का?’’
“राक्षसाच्या मृत्यूची वेळ अद्याप आलेली नाही. पण माणसं त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करू शकतात. काही माणसांपाशी ते ज्ञान आहे. त्यांनी ते सर्वांना दिलंय. पण बाकीची मूर्ख माणसं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. राक्षसाला पळवून लावण्यासाठी नाकावर मास्क लावा, एकमेकांपासून अंतर राखा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, बाहेरून घरी आल्यावर तोंड-हात-पाय स्वच्छ धुवा. एवढय़ा साध्या गोष्टी शहाणी माणसं कानीकपाळी ओरडून सांगत आहेत. पण व्हॉट्सअप विद्यापीठातली दीडशहाणी माणसं रोज नव्या अफवा पसरवताहेत. खोटी औषधं सुचवताहेत. यादवांनी दारू पिऊन आपापसात हाणामारी सुरू केली तेव्हा श्रीकृष्ण देखील हतबुद्ध झाले होते. मलाही तसंच वाटतंय.’’
“बाप रे.’’ “मागच्या महिन्यात गणपती पृथ्वीवर गेला होता. त्यानेही माणसांना सद्बुद्धी दिली. पण लोकांनी त्याच्याच समोर गर्दी करून, विसर्जनाच्या वेळी धांगडधिंगा घालून त्याचा अपमान केला. त्यामुळे तो देखील रागावलाय.’’
“आता काय करता येईल?’’
“काही करता येईल असं दिसत नाही. खाली बघ, पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते देवळे, हॉटेले वगैरेसमोर मास्क न लावता आंदोलने करताहेत. देवळे आणि हॉटेले उघडली तर लोक गर्दी करतील हेही त्यांना कळत नाही.’’ “महादेवा, तुम्हाला मला आणि सगळय़ाच देवांना हे भक्त लाज आणताहेत असं वाटतं. पण यातल्या शहाण्या माणसांना आणि भक्तांना तरी आपण वाचवायला हवं.’’
“अगदी बरोबर. सगळय़ा देवांशी यावर ताबडतोबीने चर्चा करायला हवी. चल, विष्णूलोकात जाऊ.’’