प्रतिनिधी /वास्को
वास्को मतदारसंघात यंदाही माजी आमदार कार्लुस आल्मेदा आणि कृष्णा उर्फ दाजी साळकर यांच्यातच थेट लढत झालेली आहे. दोन्ही उमेदवार तेच आहेत. मात्र, पक्ष बदललेले आहेत. काँग्रेस आणि भाजपाचे हे उमेदवार विजयाचा दावा करीत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. परंतु या दोघांपैकी जिंकणार कोण हा सर्वसामान्य आणि तटस्थ मतदारांना पडलेला प्रश्न आहे.
सोमवारी झालेल्या निवडणुकीत वास्को मतदारसंघात 70 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान मागच्या निवडणुकीपेक्षा 1 टक्क्याने कमी आहे. 35,139 मतदारांपैकी 25,070 मतदारांनी मतदान केले आहे. या मतदानाचा कल अस्पष्ट आहे. वास्कोत एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. मात्र, काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्येच ही थेट लढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तरीही ही निवडणुक एकतर्फी होणार नसल्याचे दिसून येते. वास्कोत प्रथमपासूनच भाजपा आणि काँग्रेसचीच हवा दिसून येत होती. प्रचाराच्या अंतीम टप्प्यात या दोन उमेदवारांमध्ये विजयासाठी चढाओढ सुरू होती. या निवडणुकीत भाजपाने त्यांचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांना बाजुला करून विजयाच्या आशेने दाजी साळकर यांचा आधार घेतला. तर दुसऱया बाजुने काँग्रेसला कार्लुस आल्मेदा यांचा आधार मिळाला. आणि आल्मेदा यांना काँग्रेसचा आधार मिळाला. कुणाला कुणाचा आधार लाभदायक ठरतो हे मार्चच्या दुसऱया आठवडय़ातच कळेल. वास्कोत आम आदमी, रिवोल्युशनी गोवन्स आणि इतर उमेदवारांचा फारसा प्रभाव पडलेला नाही. मात्र, तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सैफुल्ला खान या जय पराजयात महत्वाची भुमिका बजावतील असे बोलले जात आहे. सोमवारी संध्याकाळी मतदान संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसच्या गोटात समाधान पसरल्याचे दिसून आले. दोन्ही उमेदवारांना विजय आपलाच असल्याचे खात्रीपूर्वक वाटत आहे. त्यामुळे वास्कोतील लढतीबाबत उत्सुकता वाढलेली आहे.
विजयासाठी पुन्हा कार्लुस आल्मेदा व दाजी साळकर यांच्यातच सामना
मागच्या निवडणुकीत वास्कोत कार्लुस आल्मेदा हे दाजी साळकरांविरूध्द बऱयाच कष्टाने जिंकले होते. त्यापूर्वी वास्कोत दुसऱयांदा कुणीच जिंकला नव्हता. कार्लुस आल्मेदा यांनी हा विक्रम केला. मागच्या निवडणुकीत ते भाजपाचे उमेदवार होते. तर दाजी साळकर हे भाजपापासून दूर होऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले होते. अपक्ष असूनही त्यांनी भाजपाच्या उमेदवाराविरूध्द चांगली लढत दिली होती. त्याचाच परीणाम म्हणून यंदा भाजपाने साळकर यांनाच उमेदवारी देऊन सुरक्षीत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वेळी विजयी उमेदवार कार्लुस आल्मेदा यांना 8,765 एवढी मते पडली होती. तर पराभूत उमेदवार दाजी साळकर यांना 7,414 एवढी मते पडली होती. कार्लुस आल्मेदा यांचा एकूण 1351 मतांनी विजय झाला होता. तेव्हापासुनच वास्कोत दाजी साळकर हे भाजपाचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरले होते. मात्र, शेवटी भाजपाचे प्रतिस्पर्धीच या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार ठरले. साळकर यांना काँग्रेस पक्षानेही गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साळकर यांना भाजपाच अधिक सोयीस्कर वाटल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांना काँग्रेसची दारे उघडी झाली. या दोन्ही उमेदवारांनी मिळालेल्या संधीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे.
हाताला साथ की कमळाला दाद हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे
ही निवडणुक एकतर्फी नाही. मतदारांचा कल भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडेच राहिलेला आहे. या मतदारसंघातील पारंपरीक उमेदवार जुझे फिलीप डिसोजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागच्या निवडणुकीत 4202 मते प्राप्त केली होती. यंदा ते वास्कोतील रिंगणात उतरले नाहीत. त्यामुळे त्यांची मते कुणाकडे वळली असेल याच्यावरही खल होऊ लागला आहे. ही मते काँग्रेसच्याच पारडयात पडतील असे अनेकांना वाटत आहे. दाजी साळकर यांना भाजपाच्या संघटन शक्तीचा चांगला फायदा निवडणुक प्रचारात झाला. ही संघटन शक्ती कार्लुस आल्मेदा यांनीच मागच्या दहा वर्षात उभी केली होती. कार्लुस आल्मेदा यांना मात्र, काँग्रेस संघटन नव्याने घडवावे लागले. काँग्रेसची मते वास्कोत मोठय़ा प्रमाणात आहेत. परंतु काँग्रेस संघटन वास्कोत जवळपास शुन्यावरच आले होते. कार्लुस आल्मेदा यांच्या आगमनाने आणि निवडणुकीच्याच निमित्ताने हे संघटन पुन्हा उभे करण्यास आल्मेदा यांना यश आलेले आहे. भाजपाचा त्याग करताना भाजपामधील त्यांचे समर्थकही भाजपावासी झाले. त्यामुळे जाताना थोडी भाजपाही ते घेऊन गेले. या साऱयाचा लाभ त्यांना विजयासाठी होईल काय हे पाहावे लागेल. साळकर आणि कार्लुस आल्मेदा यांनी वास्को मतदारसंघात बऱयापैकी वातावरण निर्मिती केली. वास्कोतील काही भागातील मतदारांचा कल कार्लुस आल्मेदा यांच्या बाजुने आहे. तर काही भागातील मतदारांचा कल दाजी साळकर यांच्या बाजुने आहे. वास्कोत या दोनच उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. मात्र, विजयाचे चित्र अस्पष्ट आहे. वास्कोतील जनता काँग्रेसच्या हाताला साथ देते की भाजपाच्या कमळाला दाद देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे.