सुमारे 11 हजार वाहनांवर कारवाई, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱयांविरोधात बडगा
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात रत्नागिरीत वाहन चालकांनी नियम मोडण्याचा विक्रमच केला आहे. केवळ 20 दिवसांत वाहतूक पोलिसांनी तब्बल 10 हजार 885 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 37 लाख 62 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एवढय़ा मोठया प्रमाणावर दंड वसूल होण्याची ही जिल्हय़ातील पहिलीच वेळ असावी.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यासह जिह्यातही संचारबंदी करण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती मोहिमही राबवण्यात आली. मात्र गरज नसतानाही अनेकजण संचारबंदीचा भंग करत रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या वाहन चालकांना पोलिसांनी सुरूवातील समजावून सांगितले, तरीही फारसा फरक न पडल्याने अखेर दंडात्मक कारवाईची मोहिम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली.
22 मार्चपासून अनावश्यक फिरणाऱया व योग्य कागदपत्रे नसणाऱया वाहन चालकांविरोधात पोलीसांनी कारवाई सुरू केली. केवळ 20 दिवसाच्या कालावधीत वाहतूक शाखेने जवळपास 38 लाखांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणाऱया वाहन चालकांवर करण्यात आली आहे. विना हेल्मेट फिरणाऱया 4 हजार 924 दुचाकी चालकांविरोधात कारवाई करताना त्यांच्याकडून 24 लाख 62 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सीट बेल्टचा वापर न करणाऱया 441 चारचाकी चालकांना 88 हजार 200, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱया 30 जणांकडून 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विमा नसणाऱया 23 जणांकडून 30 हजार 700, वाहन चालवण्याचा परवाना नसणाऱया 157 वाहन चालकांना 78 हजार 500, पॅन्सी नंबर वापरणाऱया 247 जणांना 54 हजार 200, अधिकृत कागदपत्र नसणाऱया 2 हजार 146 जणांना 54 हजार 200, ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱया 58 जणांना 11 हजार 600 आणि इतर मध्ये 2 हजार 595 जणांना 5 लाख 36 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुक शाखेने एवढय़ा कमी कालावधीत 38 लाखांचा दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.