कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये बेळगाव जिल्हय़ासह राज्यासाठी अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. बेळगावसाठी अनेक तरतुदी मांडण्यात आल्या असून यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काहींनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर काहींनी मात्र निवडणुका डोळय़ासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प, असे याचे सारांश मांडले.
राज्य सरकारने मराठा समाजाला खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केला आहे. याचबरोबर बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गासाठी तरतूद करण्यात आल्याने या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. शहापूरच्या साडीला दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातून लोककल्याणाचा विचार
मुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला पूरक आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सरकारी शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले आहे. कृषीक्षेत्राला मोठा हातभार लावणाऱया या अर्थसंकल्पात अथणीत नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. आरोग्यक्षेत्राच्या विकासासाठी अधिक अनुदान देण्यात आले आहे. लोककल्याणाचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांचे कौतुक प्रभाकर कोरे यांनी केले.
– प्रभाकर कोरे (अध्यक्ष-केएलई संस्था)
कामगारविरोधी अर्थसंकल्प
शुक्रवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा पुढील निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून मांडण्यात आला आहे. असंघटित कामगारांची निराशा करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. बांधकाम कामगारांप्रमाणेच नरेगा व इतर असंघटित कामगारांना सुविधा द्याव्यात, अशा मागणीचे निवेदनही आमच्या संघटनेने मुख्यमंत्र्याकडे दिले होते. परंतु असंघटित कामगारांकडे शासनाने कानाडोळा केला आहे. हा अर्थसंकल्प कामगारविरोधी असल्याचे मत ऍड. लातूर यांनी व्यक्त केले.
-ऍड. एन. आर. लातूर(अध्यक्ष-बेळगाव बांधकाम कामगार संघटना)
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केला. ग्लोबल टेक्नॉलॉजी डिझाईन, किडवाई कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या नव्या रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद, शहापूरच्या साडीसाठी मायक्रो क्लस्टर यासह इतर तरतुदी केल्या आहेत. यामुळे बेळगाव जिल्हय़ाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पी. एस. हिरेमठ यांनी व्यक्त केला.
-पी. एस. हिरेमठ (अध्यक्ष-क्रिडाई बेळगाव)
समाधानकारक अर्थसंकल्प
राज्य सरकारने अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांसाठी थोडय़ा प्रमाणात का होईना पण तरतुदी केल्या आहेत. केआयडीबीच्या माध्यमातून लघुउद्योगांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर शहापूर साडीसाठी क्लस्टर निर्माण केले जाणार आहे. जांबोटी येथील मध निर्मितीतून शेतकऱयांच्या पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाने इंधनामध्ये बचत होऊन गती वाढणार असल्याने त्याचा फायदा नागरिकांना होईल, असे चौगुले यांनी सांगितले.
– महादेव चौगुले (अध्यक्ष- लघुउद्योजक संघटना, बेळगाव)