प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनपासून पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यामुळे सातारकर नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी रविवारी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. शहरातील विविध भागात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र चार वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ सुरू होती. यामुळे विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
पॉझिटिव्हीटी रेट वाढल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. विकेंड लॉकडाऊनपासून यांच्या अंबलबजावणीला सूरूवात झाली आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू होती. यामुळे सकाळपासून खरेदीला नागरिकांनी गर्दी केली होती. प्रवासी वाहनांपेक्षा खाजगी वाहनांची संख्या वाढली होती. वाहनांची संख्या वाढताच पोलीसांनी वाहनधारकांची चौकशी सुरू केली. यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी, दवाखाना यांची कारणे पुढे करण्यात आली. दुपारपर्यंत वाहनांची वर्दळ सुरू होती. मात्र दुपारनंतर शहरात पुन्हा शुकशुकाट पसरला. उद्या (दि. 5) रोजी कडक लॉकडाऊनची अंबलबजावणी होणार आहे. यामुळे पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.