बिहारमधील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था/ सुपौल
बिहारमधील सुपौल येथे शुक्रवारी विजेचा धक्का बसल्याने सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत. वीरपूरमध्ये एसएसबीच्या 45 व्या बटालियनच्या शिबिरात प्रशिक्षणार्थी जवानांचे प्रशिक्षण सुरू असताना ते अतिदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आले. प्रशिक्षण सुरू असलेल्या मैदानावरून जाणारी अतिदाबाची वीजवाहिनी हटविण्यासाठी अनेकदा वीज विभागाला सांगण्यात आले होते. परंतु अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे एसएसबीकडून सांगण्यात आले.
मृत जवानांमध्ये मूळचे महाराष्ट्राचे अतुल पाटील (30 वर्षे), परशुराम सबर (24 वर्षे) आणि महेंद्र कुमार बोपचे (28 वर्षे) यांचा समावेश आहे. या तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर विजेच्या धक्क्यामुळे जखमी जवानांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.