वार्ताहर / कोकरुड
शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील तरुण शेतकरी विलास बाळकू रोकडे(वय-37 वर्षे) याचा शेतात ऊस लागण करणेसाठी गेला असता, विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजता घडली.
या घटनेची कोकरूड पोलीस ठाण्यात नोंदी झाली असून घटनास्थळी व कोकरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिळाशी येथील विलास बाळकू रोकडे हा तरुण गुरुवारी सकाळी सहा वाजता नदीकाठावरील ’डोल ’नामक वस्तीवर ऊस लागण करण्यासाठी गेला होता. वारणानदी काठावरील विद्युत मोटार चालू करणेस गेला असता त्यास विजेचा शॉक लागून मयत झाला. मात्र तास-दीड तास उलटून गेला तरी ऊस लागणीकडे विलास न आलेने वाट पाहत बसलेला त्याचा चुलत भाऊ भगवान पांडुरंग रोकडे विद्युत मोटरीकडे गेला असता तेथे त्याला मीटर पेटीजवळ विलास बेशुद्ध पडलेला दिसून आला. त्याने ताबडतोब फोनवरून ही माहिती बाबासो कृष्णा रोकडे याला दिली असता बाबासो रोकडे, विजय रोकडे, आनंदा रोकडे आदि आजूबाजूचे तरुण घटनास्थळी पोहचले व त्यांनी 108 रुग्णवाहिका बोलवून त्याला ताबडतोब शिराळा ग्रामीण रुग्णालयात नेले. उत्तरीय तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मयत म्हणून घोषित केले. या घटनेची फिर्याद बाबासाहेब कृष्णा रोकडे (वय 38) यांनी कोकरुड पोलिसांत दिली असून अधिक तपास स पो नी दत्तात्रय कदम यांचे मार्गदर्शनाखाली एस व्ही जाधव करत आहेत.
मयत विलास याच्या पाठी बायको, दोन मुले, आई, वडील असा परिवार असून याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या आकस्मिक मृत्यूने बिळाशी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यस वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे बोलले जात असून त्यांच्या कडून या तरुण शेतकयाच्या मृत्यूची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.