प्रतिनिधी/ पणजी :
राज्यातील विद्यालये कधी सुरू करायची याबाबत राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय अद्याप घेतलेला नाही. तथापि, एनसीईआरटीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यालये जुलै महिन्यात सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्या सूचनेप्रमाणे शिक्षण खाते विद्यालये जुलैपासून सुरु करण्याचा प्रस्ताव सरकारला देणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला, मध्यास की शेवटास विद्यालये चालू करावीत, असा कोणताही खुलासा त्या तत्वात नसल्यामुळे त्या जुलै महिन्यात नेमक्या कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे.
शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 मार्चपासून गोव्यातील सर्व विद्यालये बंद करण्यात आली असून कोरोनाचे लॉकडाऊन चालू असल्याने ती अद्याप सुरू झालेली नाहीत. शिक्षण खात्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत्या 4 जूनपासून विद्यालये नवीन शैक्षणिक वर्ष 2020 – 21 साठी सुरू करण्यात येणार होती. परंतु आता विद्यालये त्या तारखेपासून चालू करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे.
परीक्षा वेळेवर न झाल्याने समस्या
सध्याचे लॉकडाऊन 31 मे पर्यंत चालणार असून त्यानंतर पुन्हा लॉकडाऊनचा काळ वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. नवीन लॉकडाऊन काळात केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे पाहून शिक्षण खाते त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेले दोन महिन्यापेक्षा अधिक काळ विद्यालये बंदच असून एप्रिल व मे हे दोन महिने विद्यालये तशी बंदच असतात. त्यामुळे सदर बंदीचा फारसा मोठा परिणाम जाणवलेला नाही. फक्त परीक्षा झालेल्या नाहीत हाच काय तो फरक आहे.
चार जूनपासून विद्यालये सुरु होणे अशक्य
विद्यालये पुन्हा सुरू होण्याची नियोजित तारीख 4 जून असून त्यासाठी आता फक्त एक आठवडा बाकी आहे. त्यामुळे या कालावधीत सरकारला, शिक्षण खात्याला विद्यालये सुरू करण्याबाबत काही तरी निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. सध्याची एकंदरीत वस्तुस्थिती पाहता येत्या 4 जूनपासून शाळा सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही. पुढील वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू झालेली नाही.