गावातील समस्या घेतल्या जाणून : घरोघरी भेट देऊन नागरिकांची केली विचारपूस
प्रतिनिधी /बेळगाव
विरापूर (ता. कित्तूर) येथे शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी ग्रामवास्तव्य केले. वास्तव्यासाठी आपल्या अधिकाऱयांच्या लव्याजम्यासह एम. जी. हिरेमठ हे बसमधून विरापूरला पोहोचले. दिवसभर गावाचा फेरफटका मारून समस्या जाणून घेतल्या.
दर महिन्याच्या तिसऱया शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी ग्रामवास्तव्य करावे, एखाद्या गावात जाऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी महसूल मंत्री आर. अशोक यांनी यापूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. कोरोनामुळे तो बंद पडला होता. कोरोनाचा फैलाव कमी झाल्यामुळे पुन्हा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जगद्गुरू केदारलिंगेश्वर मंदिरात पूजन करून जिल्हाधिकाऱयांनी गावच्या दौऱयाला सुरुवात केली. हातात डायरी व पेन घेऊन प्रत्येक घराला भेटी देत नागरिकांची विचारपूस केली. विरापूरवासीय महिलांनी औक्षण करून जिल्हाधिकाऱयांचे स्वागत केले. सत्यम्मा देवी मंदिरात दर्शन घेऊन आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकाऱयांनी अंगणवाडीला भेट देऊन सरकारी नियमानुसार तेथील मुलांना माध्यान्ह आहार मिळते की नाही, यासंबंधी चौकशी केली व स्वतः दूध वाटप केले. दलित वसाहतीतील समस्या जाणून घेतल्या. गावात पावसामुळे किती घरांची पडझड झाली आहे? याची स्वतः भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी शशिधर बगली, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सी. बी. कोडली, कृषी खात्याचे शिवनगौडा पाटील, पशुपालन खात्याचे डॉ. अशोक कोळ्ळा, समाज कल्याण खात्याच्या डॉ. उमा सालिगौडर आदींसह वेगवेगळय़ा खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.