राज्यपाल भेटीचा बाऊ केल्याचा आरोप : ट्विटरवरून उमटल्या समर्थक-विरोधी प्रतिक्रिया
प्रतिनिधी /पणजी
सरकार स्थापनेचा दिवस ठेपला तरीही विधीमंडळ नेता निश्चितीत होणाऱया विलंबामुळे भाजपात अस्वस्थता निर्माण झालेली असतानाच आमदार विश्वजित राणे यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतल्याने मोठा वाद निर्माण होऊन उलटसुलट चर्चा, वावडय़ांना ऊत आला.
मात्र राणे यांनी या सर्वांचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. राज्यपालांशी झालेल्या आपल्या भेटीचा पत्रकारांनी विनाकारण बाऊ केला, असा आरोप त्यांनी केला आहे. एखाद्या राजकारण्याची प्रत्येक भेट ही राजकीय नसते. काही गोष्टी वैयक्तिकही असू शकतात, हे पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे. आपण राज्यपालांची घेतलेली भेट ही वैयक्तिक होती. मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल राज्यपालांनी मतदारसंघास भेट देऊन आशीर्वाद द्यावे, असे निमंत्रण देण्यासाठी म्हणून आपण राजभवनवर गेलो होतो, त्याव्यतिरिक्त काहीच नव्हते, असे राणे यांनी म्हटले आहे.
स्पष्टीकरण न पटणारे, न रुचणार
परंतु राणे यांची प्रगल्भ राजकीय महत्वाकांक्षा ज्ञात असणाऱया कोणत्याही विश्लेषकास त्यांचे हे स्पष्टीकरण न पटणारे, रुचणारे असेच आहे. गोमंतकीयांनी भाजपाच्या पारडय़ात भरभरून मते टाकली असली तरी मतदार केवळ आमदार निवडू शकतात. नेता किंवा मुख्यमंत्री निवडण्याचे काम संबंधित दावेदार पक्षालाच करावे लागते. अशावेळी भाजपातही आता अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली असून त्यातून जोरदार स्पर्धा वाढली आहे.
मुख्यमंत्रीपदी सावंतांची निवड नैसर्गिक
खरे तर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड होणे हा नैसर्गिक न्याय आहे. परंतु अनेकांना आता स्वतःच मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नाही. अशा धडपडय़ा आणि अतिमहत्वाकांक्षी नेत्यांमध्ये राणे यांचा अग्रक्रम लागतो. त्यासाठीच त्यांच्या उचापती, धडपडी आणि जोरदार लॉबिंग चालले आहे. हे सत्य संपूर्ण गोमंतकीय जाणत आहेत. त्यामुळेच त्यांच्या ’त्या’ वैयक्तिक भेटीवरून मोठा वाद निर्माण झाला. परंतु या सर्वांचे खापर राणे यांनी पत्रकारांच्याच माथी फोडले आहे. आपल्या वैयक्तिक भेटीचा चुकीचा अर्थ लावणे दुर्दैवी असल्याचे ट्विटरवर जारी केलेल्या संदेशातून म्हटले आहे.
राणे यांच्या या संदेशानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील काहीजणांनी पत्रकारांचे तर काहींनी राणे यांचे समर्थन केले आहे. काही जणांनी त्यांना, ’राणेसाहेब तुमची वेळ चुकली’, असे म्हणत टीका केली आहे तर काहींनी अशी टीका, आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे मैत्रीपूर्ण सल्ले दिले आहेत. काही जणांनी मात्र ’’दिल्लीश्वरांचा तुमच्यावर डोळा आहे, जास्त ’स्मार्ट’ बनू नका’’, असे इशारेही दिले आहेत.
आगीशिवाय धूर नाही
स्टीव, प्रकाश, सिद्धार्थ नामक व्यक्तींनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, ’सर्व काही वेळेवर अवलंबून असते. कार्याची वेळ चुकली की सर्व गणिते चुकतात’, असे म्हटले आहे. एवढी धावाधाव करून राज्यपालांची भेट घेण्यासारखी कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती का? असा सवाल स्टीव यांनी उपस्थित केला आहे. केवळ निमंत्रणच द्यायचे होते तर शपथविधी नंतरही देता आले असते. निदान संशयाचे वादळ तरी निर्माण झाले नसते, असे स्टीव यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणे यांनी पत्रकारांना दोष देणे चुकीचे आहे. त्यांनी आपली डय़ुटी केली आहे, त्यातून कोणता अर्थ काढावा ते वाचकांचे मत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मित नामक अन्य एका व्यक्तीने तर राणे यांना सरळसरळ इशाराच दिला आहे. ’राणे जी, कृपा करून कोणत्याही ’स्मार्ट गेम्स’ खेळण्याचा विचारसुद्धा करू नका. दिल्ली 2500 किमी दूर असली तरीही तेथील नेत्यांचा तुमच्यावर डोळा आहे’, असे त्याने म्हटले आहे.
छड्डा नामक इसमाने मात्र राणे यांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला आहे. ’मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून आलेले तुम्ही एक चारित्र्यवान व्यक्ती आहात. या वाटचालीत तुम्हाला बदनाम करण्यासाठी टपलेल्या विरोधकांकडून कित्येक दोषारोप होतच राहतील. त्यातून नाराज होण्यापेक्षा थेट दुर्लक्ष करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांची निवड काही राज्यपाल करत नाहीत. त्यामुळे एखादा आमदार राज्यपालांना भेटला तर त्यात गैर काय आहे? असा सवाल अन्य एका व्यक्तीने केला आहे.
बाबांना राज्यपालांच्या आशीर्वादाची आताच गरज का पडावी? राज्यपाल हे देव आहेत का? आणि यापूर्वी कधी अशी वैयक्तिक भेट घेतली होती का? असे मार्मिक सवाल कौशल यांनी उपस्थित केले आहेत. त्यांचे समर्थन करताना बार्रेटो नामक व्यक्तीने, राणेंचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राज्यपालांनी वाळपईस भेट द्यावी का? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही राणे यांनी निवडणूक ते मतमोजणी या दरम्यान अनेकदा दिल्लीच्या वाऱया केल्या होत्या. त्यावेळी ते तेथील एका बलाढय़ नेत्यास भेटण्यासाठी जातात अशी जोरदार चर्चा झाली होती.