सैनिक देशासाठी प्राणार्पण करतात. शहीद सैनिकांपुढे आपण नतमस्तक होतो. पण त्यांच्या पत्नींचं काय? पतीनिधनानंतर त्या एकटय़ा पडतात. हा एकटेपणा दूर करून वीरपत्नींना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुभाषिनी वसंत करत आहेत. त्यांच्या कार्याविषयी…
सुभाषिनी वसंत या वीरपत्नी. त्यांचे पती कर्नल 31 जुलै 2007 या दिवशी काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पतीने देशासाठी प्राण अर्पण केल्याची भावना मनात ठेऊन लढवय्या वृत्तीच्या सुभाषिनी शोक करत बसल्या नाहीत. देशासाठी प्राणार्पण केलेल्या जवानांच्या पत्नींचा एकटेपणा, दुःख, वेदना त्यांना जाणवल्या. या वीरपत्नींसाठी काहीतरी करायला हवं असं त्यांना वाटून गेलं आणि अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी वसंतरत्न फाउंडेशन फॉर आर्टसची स्थापना केली. या संस्थेसाठी निधी गोळा करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. सुभाषिनी यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी ‘द सायलंट फ्रंट’ नावाचं नाटक लिहिलं. देशासाठी प्राणार्पण केलेल्या अज्ञान जवानांसाठी त्यांनी हे नाटक लिहिलं. दिल्ली आणि बंगळूरूमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले आणि यातून मिळालेला निधी फाउंडेशनच्या कामासाठी वापरण्यात आला. या वीरपत्नींचा आर्थिक मदतीसोबतच आधाराची गरज असते. त्यांच्या आयुष्याला नवा उद्देश, जगण्याची उमेद देण्यासाठी सुभाषिनी प्रयत्नशील आहेत. नृत्य, नाटक, कला, शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुभाषिनी वीरपत्नींच्या आयुष्यात आनंद फुलवत आहेत. वीरपत्नींना आर्थिक मदत तसंच हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आर्मी वाईव्हज वेलफेअर असोसिएशनची सुरूवात केली. कर्नाटकच्या ग्रामीण भागातील सैनिकांच्या वीरपत्नींच्या हक्कांसाठी ही संस्था काम करते. त्यांना विविध सरकारी योजनांची माहिती पुरवणं, या योजनांचे लाभ मिळवून देणं अशी कामं या संस्थेच्या माध्यमातून केली जातात.
सुभाषिनी शात्रीय नृत्यांगनाही आहेत. या क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कर्नल वेणुगोपाल यांच्यासोबतच्या 15 वर्षांच्या संसारातील सात वर्षं सुभाषिनी यांना वेगळं रहावं लागलं. वेणुगोपाल यांची सीमेवर तैनाती असल्यामुळे त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं.
वीरपत्नींना आर्थिक तसंच कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पेगासस इन्स्टीटय़ूटच्या सहकार्याने बंगळूरूच्या ग्रामीण भागात तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन केलं होतं. सुभाषिनी यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून 2016 मध्ये त्यांना नीरज भनोत पुरस्कार देण्यात आला. पती दूर असतानाही त्यांच्या पत्नी प्रत्येक जबाबदारी अगदी चोख बजावत असतात. त्यांचा त्यागही मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा विचार करायला हवा, असं त्या सांगतात.