प्रतिनिधी/ निपाणी
चार दिवसापूर्वी वेदगंगा नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत होती. यानंतर गुरुवारी नदीत पाणी आल्यामुळे समाधान व्यक्त होत होते. अशातच पाटबंधारे खात्याच्या सूचनेने नदीकाठच्या गावात चार दिवसांसाठी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱयांची एकच तारांबळ उडाली असून पाण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसत आहे.
नदीकाठच्या काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारी व शनिवारी सकाळी विद्युत मोटारीच्या फ्युजा काढण्यात आल्या. जत्राट, अकोळ, ममदापूर आदी गावांमध्ये लावणीसाठी अनेक शेतकऱयांनी ऊस तोडला होता. नदीत पाणी आल्यानंतर ऊस लावणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अचानक नदीकाठचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे सदर लावणी कामे खोळंबली आहेत. अशातच तोडलेला ऊस वाळत चालल्यामुळे अशा शेतकऱयांना आर्थिक फटकाही बसत आहे.
तसेच शाळू तसेच खोडवा जातीच्या उसाला पाण्याची आवश्यकता असताना वीज पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱयांची गैरसोय होत आहे. याची दखल घेऊन तत्काळ नदीकाठच्या विद्युत मोटारिंच्या फ्युजा घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मंगळवारपासून उपसाबंदी हटवणार
यासंदर्भात बोलताना पाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आप्पासाहेब पुजारी म्हणाले, दरवषी उन्हाळय़ात नदीला पाणी आल्यानंतर आठ दिवस उपसाबंदी घालण्यात येत होती. यंदा मात्र केवळ चार दिवस उपसाबंदी घालण्यात आली आहे. सोमवारपर्यंत जत्राट तसेच सिदनाळ बंधारे पूर्ण भरणार आहेत. यानंतर मंगळवारपासून उपसाबंदी हटविण्यात येईल. सर्वच शेतकऱयांना पाणी मिळावे, या उद्देशाने तात्पुरती उपसाबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.