ऑनलाईन टीम / पुणे :
वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सदभावनेने दगडूशेठ गणपती मंदिरात गणरायासमोर प्रातिनिधीक स्वरुपात 51 शहाळयांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. दरवर्षी पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित शहाळे महोत्सवात तब्बल 5 हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होतात. यंदा मात्र हा महोत्सव रद्द करुन केवळ 51 शहाळ्यांचा नैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो.
वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सदभावनेने शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. तसेच कोरोनाचे संकट देखील दूर व्हावे, अशी प्रार्थना देखील यंदा करण्यात आली.