सातारा / प्रतिनिधी :
चूक नसताना भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. जो चुकतो त्यास शिक्षा झाली पाहिजे. परंतु, न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना का करता. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचे समर्थन करणार नाही. मात्र, चूक नसताना शिक्षा देणाऱ्यांना शरद पवार काय शिक्षा करणार? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार यांना केला. दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष कुबड्या घेतल्याशिवाय चालत नाहीत. त्यांनी स्वबळाची भाषा करु नये. महाविकास आघाडी मराठा आरक्षण प्रश्नी फेल झाली आहे, असे सडेतोड आरोप करत त्यांनी बंडातात्यांच्या स्थानबद्दतेबाबतचा निषेध नोंदवला. तसेच लवजिहादचे लोण सातारा जिल्ह्यात पोहचल्याने त्यांनी त्या विवाहाला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
आज सातारा दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने घाबरटपणा सोडला पाहिजे. काळजी करणे हा वेगळा विषय आहे. ती केली पाहिजे. सातत्याने असुरक्षित वातावरणात राज्यकर्ते राहिले आहेत. जर घबराहट जनतेमध्ये पसरवत राहिले तर कोरोनाची भिती वाढत जाईल. तेही टाळले पाहिजे. कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये. यासाठीच्या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.
व्यापाऱ्यांचा रोष आहे बरोबर आहे. पण व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या नोकरांचे हातावर पोट आहे, त्या व्यक्तींनी कुठे जायचे.हातावर पोट असणाऱ्यांना मदत होईल, अशी योजना राज्य सरकारने केली नाही. याचा सर्वकष विचार जिल्हा पातळीवर केला पाहिजे. राज्य सरकारने असा विचार करावा. न केल्यास जनक्षोभ होईल, त्यास सरकार जबाबदार राहिल.