’एएसजी आय’ चे डॉ. आदित्य काजवे यांचे आवाहन : सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे 7 रोजी उद्घाटन
जय नाईक /पणजी
शरीराचा सर्वात मौल्यवान अवयव म्हणून दोळ्यांकडे पहा, त्याच्या आरोग्याशी खेळू नका, शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणेच दोळ्यांचीही काळजी घ्या, त्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी दोळ्यांची तपासणी करून घ्या, असे आवाहन प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. आदित्य काजवे यांनी केले. दोळा हा अवयव एकदा खराब झाला तर आयुष्यभर जीवनात अंधार येऊ शकतो. त्यामुळे कुणाही भोंदू वैद्यांकडून दोळ्यांवर उपचार करण्याचे टाळा, असा इशाराही त्यांनी दिला.
येत्या दि. 7 सप्टेंबर पासून गोमंतकीयांच्या सेवेत रुजू होणाऱया एएसजी आय इस्पितळातील प्रमुख डॉक्टरांच्या टीममधील सदस्य असलेले डॉ. काजवे दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत डॉ. सियन सोक्रेटीस दा सिल्वा आणि डॉ. चंद्रप्रकाश ओली यांचीही उपस्थिती होती.
दोळ्यांवरील उपचारांसंबंधी 20 वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानात आज जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. दोळ्यांची पुतळी आणि पडदा यांच्या उपचारांवर आता अतिअत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. स्टेट ऑफ आर्ट यंत्रांमुळे सूई न टोचता देखील गुंगी देण्याएवढी प्रगती तंत्रज्ञानात झाली आहे. त्याचबरोबर एखाद्या अपघातात संपूर्ण बुबूळ बाहेर पडलेला दोळा देखील वेळीच उपचारांद्वारे पूर्ववत करणे शक्य झाले आहे, आणि त्या क्षेत्रातील प्रगल्भ अनुभव असलेले डॉक्टर्स आज आपल्या भारतात उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक नागरिकास स्वस्त व परवडण्यायोग्य दरात दोळ्यांची देखभाल आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. अरुण सिंघवी यांनी डिसेंबर 2005 मध्ये जोधपूर शहरात पहिल्या इस्पितळाची स्थापना केली, आणि अवघ्या 14 वर्षांच्या प्रवासात तीन देशात, 30 शहरात तब्बल 36 इस्पितळांची उभारणी केली. त्यातून आतापर्यंत 55 लाख पेक्षा जास्त लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.
त्याच मालिकेतील एक सुपर स्पेशालिटी इस्पितळ गोव्यात मिरामार दोनापावला मार्गावर करंझाळे येथे ऑडी शोरुम इमारतीत स्थापन करण्यात आले आहे. दि. 7 रोजी सायंकाळी त्याचे उद्घाटन होणार आहे. दोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित ’ए टू झेड’ देखभाल, उपचार, औषधे, चष्मे हे सर्व काही एकाच छताखाली देणारी जागतिक सुविधा तेथे उपलब्ध करण्यात आली आहे.
लहान मुलांमध्ये काही प्रकरणात जन्मजात नेत्रदोष तर काही प्रकरणात मोबाईलसारख्या उपकरणांमुळे दोष निर्माण होत असतात. सध्या कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. सततच्या मोबाईल वापरामुळे दोळ्यांच्या स्नायुंवर ताण येतो. त्यातून मुलांच्या आरोग्यावर परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे मर्यादीत वापर, ठराविक अंतराने दोळ्यांवर पाणी मारणे, काळोख्या खोलीत वापर टाळणे, यासारखे उपाय हिताचे ठरू शकतात, असे डॉ. काजवे म्हणाले.
गोव्यातील आपल्या इस्पितळाबाबत सांगताना ते म्हणाले, लवकरच आम्ही मेडिक्लेम, डीडीएसएसव्हाय यासारख्या योजनांसाठीही करार करणार आहोत. नेत्रपेढी स्थापन करण्याचीही योजना असून त्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.