बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून तब्बल चार वर्षे कारावास भोगलेल्या शशिकला नटराजन ऊर्फ चिन्नम्मा (वय 66) यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे. गेल्या रविवारी त्यांची सुटका करण्यात आली. श्वसनाच्या त्रासामुळे 20 जानेवारी रोजी शशिकला यांना कारागृह प्रशासनाने इस्पितळात दाखल केले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर कोरोनावरील उपचारासाठी व्हिक्टोरिया इस्पितळात हलविण्यात आले. प्रकृती बिघडली नसती तर 27 जानेवारीला कारागृहातून त्यांची सुटका झाली असती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 31 जानेवारी रोजी इस्पितळातून त्यांची सुटका करण्यात आली. सध्या देवनहळ्ळीजवळील एका रिसॉर्टमध्ये त्या विश्रांती घेत आहेत. नियमानुसार कोरोनावरील उपचारानंतर किमान आठवडाभर विलगीकरणात रहावे लागणार आहे. म्हणून थेट त्या तामिळनाडूला गेल्या नाहीत.
शशिकला या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवलग मैत्रीण. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील घडामोडींमुळे शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. अभाअण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडली. आता निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर शशिकला यांच्या सुटकेला विशेष महत्त्व आले आहे. व्हिक्टोरिया इस्पितळातून बाहेर पडताना आपल्या राजकीय विरोधकांना इशारा देणारी त्यांची देहबोली होती. कारण जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे चिन्नम्मा यांनी आपल्या हाती घेतली होती. पन्नीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदावरून त्यांची हकालपट्टी करून सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी शशिकला मैदानात उतरणार, याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. मुख्यमंत्री असताना जयललिता ज्या कारचा वापर करीत होत्या, त्याच कारमधून शशिकला बेंगळूरातून बाहेर पडल्या. त्या कारवर पक्षाचा झेंडा फडकत होता. येत्या आठवडाभरानंतर त्या तामिळनाडूत जाणार आहेत. तामिळनाडूत अण्णाद्रमुकने भाजपशी हातमिळवणी केली आहे. पक्षाचा हा निर्णय चिन्नम्माला रुचलेला नाही, असे दिसते. आता त्यांची भूमिका काय? जिवलग मैत्रिणीच्या समाधीवर घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी त्या राजकारणात उतरणार, हे निश्चित आहे.
दक्षिणेत व्यक्तिपूजा होते. तत्त्व, सिद्धांत आदींपेक्षा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक छबीला अधिक महत्त्व दिले जाते. खासकरून सिनेमाच्या माध्यमातून नावारूपास आल्यानंतर राजकारणात येणाऱयांची तर पूजाच केली जाते. त्यांची मंदिरेही बांधली जातात. कर्नाटकात डॉ. राजकुमार यांना मोठी संधी होती. मात्र, कलाजीवन सोडून राजकारणात जाणे त्यांनी पसंत केले नाही. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आजवर अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांनी राजकीय क्षेत्र गाजविले आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय पक्षांना उतरती कळा लागल्याचे जाणवत होते. तामिळनाडूच्या राजकारणाला शशिकलांच्या प्रवेशाने शक्ती प्राप्त होणार आहे. कारण व्यक्तिपूजेचा अद्भूत नमुना रविवारी बेंगळूर येथे पहायला मिळाला. शशिकला काही स्वातंत्र्यलढय़ात किंवा शेतकरी आंदोलनात भाग घेऊन कारागृहात गेल्या नव्हत्या. भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना न्यायालयाने चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात शिक्षा भोगतानाही शशिकला वादग्रस्तच होत्या.
त्यांना विशेष सुविधा पुरविल्याबद्दल कर्नाटकातील अनेक वरि÷ अधिकाऱयांची चौकशी झाली. काही जणांवर कारवाई झाली. अशी पार्श्वभूमी असूनही शिक्षा भोगून बाहेर पडताना चिन्नम्माचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. इस्पितळाबाहेर हातात त्यांची प्रतिमा घेऊन जयजयकार करणाऱया कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. तामिळनाडूतून बेंगळूरला येऊन कार्यकर्त्यांनी जल्लोषात चिन्नम्माचे स्वागत केले. ही जादू तामिळनाडूच्या राजकारणात चालणार का, असा प्रश्न आहे. कारण चार वर्षात तामिळनाडूतही अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. जयललिता यांना जो मान होता तसा चिन्नम्माला मिळेलच, असे नाही. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये शशिकला यांना आपली ताकद दाखवावीच लागेल. कावेरीच्या मुद्दय़ावर तामिळनाडूतील राज्यकर्ते नेहमी कर्नाटकाविरुद्ध आक्रमक होतात. मात्र, त्यांची नाळ कर्नाटकाशीच जोडलेली आहे. जयललिता मूळच्या कर्नाटकाच्या. मात्र, तामिळनाडू व कर्नाटकाचा कसलाही वाद निघाला की त्या तामिळनाडूच्या बाजूनेच असायच्या. हीच गोष्ट सुपरस्टार रजनीकांतबाबतही घडताना दिसते. रजनीकांत कर्नाटकाचे. सध्या तामिळनाडूत त्यांची आराधना केली जाते. ज्यावेळी कावेरीचा मुद्दा येतो त्यावेळी तेही आक्रमक होतात. कमल हसन हा आघाडीचा अभिनेताही याला अपवाद नाही.
कर्नाटकातही राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वावर हायकमांडने शिक्कामोर्तब केल्यानंतरही काही आमदारांनी आमदार निवासात स्वतंत्र बैठक घेतली. सोमवारी रात्री ही बैठक झाली. निमित्त मेजवानीचे होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लगेच दुसऱया दिवशी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनीही मेजवानीचे आयोजन केले. अनेक संघनि÷ आमदारांनी याकडे पाठ फिरविली. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडीच उघडली आहे. गुढी पाडव्यापर्यंत थांबा आणि काय होते पहा, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला नेतृत्वबदल होणार का हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. येडियुराप्पा सत्तेवर आल्यापासूनच हा नेतृत्वबदलाचा प्रश्नही उद्भवला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार असो, खातेवाटप असो त्यापाठोपाठ नाराजी आणि नेतृत्वबदलाचा सूर निघतोच. आता त्यासाठी गुढी पाडव्याची डेडलाईन दिली आहे. येडियुराप्पा सत्तेची गुढी राखण्यात यशस्वी होतात की त्यांचे विरोधक नवी गुढी उभारतात, याकडे आता साऱयांचे लक्ष लागले आहे.