प्रतिनिधी/ बेळगाव
सूर्यग्रहणानिमित्त निसर्गाचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी रविवारी बेळगावकरांना लाभली. सुटीचा दिवस असल्याने ग्रहणाचे वेध पाळण्यापासून ते सूर्यग्रहणाच्या मोक्षापर्यंतचा काळ अनुभवण्यात आला. पावसाळी वातावरणामुळे सूर्यग्रहण स्पष्ट दिसण्याबाबत साशंकता होती. मात्र वातावरण अनुकूल असल्याने हा नाटय़मय आविष्कार अबालवृद्धांपासून अनेकांनी पाहिला. ग्रहणाच्या निमित्ताने दिसणारा सावल्यांचा खेळ मोक्षापर्यंत अर्थात दुपारी 1.28 पर्यंत अनुभवता आला.
शनिवारी रात्रीपासूनच ग्रहणाचे वेध लागले होते. मात्र ग्रहण स्पर्शकाळ सकाळी 10 वाजून 4 मिनिटांनी झाला. तेव्हापासून दुपारी 11 वाजून 39 मिनिटांनी मध्य व दुपारी 1.28 वाजता मोक्ष असल्याने या काळात सूर्यग्रहणाच्या विविध अवस्था दिसून आल्या. हा अनुभव प्रत्यक्ष आपल्या डोळय़ात कैद करण्यासाठी विशेष चष्मे, काळी काच तसेच किरण थेट डोळय़ावर पडू नयेत यासाठी फिल्टर्स तसेच जुना एक्सरे, प्लास्टिक जाड पेपर यांचा उपयोग करून निसर्गाच्या कलाविष्काराचे नाटय़ पाहिले. विशेषतः सुटीचा दिवस असल्याने पालकांनी कुटुंबासमवेत ग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला. यामुळे अंगणात तसेच गच्चीवर, मोकळय़ा मैदानावर ग्रहण पाहत असल्याचे चित्र दिसून आले. तर व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने कामावर असलेल्या नागरिकांनीदेखील हा आविष्कार अनुभवला.
परंपरेची पाळवणूक
ग्रहणाच्या वेधापासून मोक्षापर्यंतच काळ पाळण्याची अनेकांची परंपरा आहे. त्यानुसार अनेकांनी वेध काळ पाळला. यामुळे कोणतेही कार्य न करता ग्रहण स्पर्शापूर्वी जेवण व नित्यकर्म पूर्ण करण्यात आले. 3 तास 27 मिनिटांच्या ग्रहणकाळात प्रामुख्याने मंत्रपठण, जप करत, धार्मिक पुस्तकांचे वाचन करण्यात आले. ग्रहणकाळ संपताच सर्व शुद्धीकरण करून स्नान करून पुढील कार्य पार पाडण्यात आल्याचे दिसून आले.
ग्रहणाचे दान द्या!
ग्रहण सुटताच ग्रहणाचे दान दिले जाते. ग्रहण काळातील अशुभ छाया दान दिल्यामुळे नष्ट होते आणि सुख-शांती लाभते. यामुळे प्रामुख्याने ग्रहण सुटताच ग्रहणाचे दान देण्यात आले. विशेषतः ग्रहण सुटल्याची जाणीव गल्लोगल्ली ग्रहणाचे दान मागणाऱया महिलावर्गांच्या आवाजानेच झाली. दे दान सुटे गिराणची आरोळी देत गल्लोगल्ली जाऊन दान मागितले जाते. यामुळे हे ग्रहण सुटल्यानंतर भोजनापासून ते कपडय़ांपर्यंतचे दान देऊन ग्रहणाच्या दानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात झाल्याचे दिसून आले.
ग्रहण आणि उभे राहणारे मुसळ
ग्रहण आणि उभे राहणारे मुसळ याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शहरातील विविध मंदिरांबरोबरच घरोघरी पाणी भरलेल्या परातीत मुसळ उभे करण्यात आल्याचे दिसून आले. ग्रहण काळापासून ग्रहण सुटेपर्यंत हे मुसळ कोणताही आधार नसताना उभे राहते मात्र ग्रहण सुटताच मुसळ खाली पडते. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तसेच विज्ञान आणि प्रथा, समज-गैरसमज यांचा ताळमेळ अभ्यासण्यासाठी अनेकांनी हा प्रयोग केला.