हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे चार दिवस पाणीपुरवठय़ात होणार व्यत्यय
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना तीन दिवसांआड आणि काही ठिकाणी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, काही भागात पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशातच आता हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे चार दिवस संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार असल्याची माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.
त्यामुळे कडक उन्हाच्या झळांबरोबर पाणीटंचाईच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. हिडकल जलाशयामधून जादा पाणी उपसा करण्याची क्षमता वाढवूनदेखील पाणीटंचाई निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यंदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. शहरातील काही भागात पाण्याचा दुरुपयोग होत आहे. यामुळे राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा कमी होत आहे. जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जलाशयामध्ये आहे. पण आतापासून शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शहरातील विविध भागात पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही उपनगरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. चार दिवसाड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात आली आहे. हिडकल जलाशयामधून मागील वषीपासून सहा एमजीडी जादा पाणी उपसा करण्यात येत आहे. तरीही शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. सध्या पिण्यासाठी सुरळीत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पण काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. भारनियमन, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कारण सांगून पाणीपुरवठा कपात केला जात आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणी मुबलक मिळत नाही. पाणीटंचाईचा फटका नागरिकांना बसत आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याची माहिती एलऍण्डटी कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.