131 पाहुण्यांसह 30 हजार फुटांच्या उंचीवर विवाह
तामिळनाडूच्या मदुराई येथील एक जोडपे स्वतःच्या विवाहावरून चर्चेत आले आहे. या जोडप्याने विमानात विवाह केला आहे. तामिळनाडूत 24 मे पासून 31 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. अशा स्थितीत राज्यात कुठल्याही प्रकारच्या आयोजनाची अनुमती देण्यात आलेली नाही.
पण 23 मे रोजी एक दिवसासाठी कोरोना संचारबंदीत सूट देण्यात आली होती. याचदरम्यान मदुराईच्या मंदिराबाहेर बहुतांश जोडपी विवाह करताना दिसून आली आहेत.
मदुराईतील राकेश आणि दीक्षानेही 23 मे रोजी विवाह केला पण विमानात. या विवाहसोहळय़ाला 131 पाहुणे उपस्थित होते. दोघांचा विवाह तसा 20 मे रोजी पार पडला होता. पण तेव्हा खूपच कमी नातलग सामील झाले होते. राज्यात एक दिवस निर्बंध शिथिल करण्याची घोषणा होताच विवाहाला स्मरणीय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येताच त्यांना विवाह सोहळय़ात सामील करण्यात आल्याचे जोडप्याने म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
याचदरम्यान विवाहाची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर लोकांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. कोरोनादरम्यान अधिक संख्येत लोकांना सामील करणे चुकीचे आहे, याची कुठलीच गरज नव्हती असे काही जणांचे म्हणणे आहे. तर छायाचित्रांमध्ये दिसून येत असलेल्या लोकांनी मास्कही घातलेला नव्हता.