केंद्र सरकारची सहा राज्यांना नववर्ष भेट : भूकंप प्रतिरोधक भक्कम घरांची होणार निर्मिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2022 पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’चे उद्घाटन केले. नव्या वर्षातील हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच कार्यक्रम असून शहरी भागातील लोकांना घरे देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
लाईट हाऊस प्रकल्प ही केंद्रीय नगरविकास मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रकल्पांतर्गत गरीब जनतेला स्वस्त, भूकंपविरोधी आणि मजबूत घरे देण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे ही योजना राबविणार असून सध्या त्रिपुरा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. आज मध्यम वर्गासाठी घरे तयार करण्यासाठी देशाला एक नवे तंत्र मिळत आहे. सहा राज्यांमधील हा लाईट हाऊस प्रोजेक्ट देशाला गृह निर्माणाचा नवा मार्ग दाखवेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पांतर्गत शहरी भागातील गरीबांसाठी ‘लाईट हाऊस घरे’ आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केली जातील. ही घरे अधिक मजबूत आणि गरीबांसाठी सुविधाजनक तसेच आरामदायकही असतील, असे ते पुढे म्हणाले. तसेच हा प्रकल्प म्हणजे एक ‘को-ऑपरेटिव्ह फेडरिलिझम’चे उदाहरण असेल, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
लाईट हाऊस प्रोजेक्टअंतर्गत देशातील 6 शहरांमध्ये 365 दिवसांत 1 हजार घरे बांधली जातील. या गतीनुसार दिवसाला साधारण अडीच ते तीन घरे बांधून तयार करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही अध्ययन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. नवनिर्मित घरांसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने सदर प्रकल्प भारतासाठी योग्य आहे का? याचा अभ्यास करावा. तसेच त्यात सुधारणाही सुचवाव्यात, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
लाईट हाऊस प्रकल्प…
लाईट हाऊस प्रकल्प ही केंद्रीय शहरी मंत्रालयाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत लोकांसाठी स्थानिक वातावरण आणि पर्यावरणाला ध्यानात घेऊन शाश्वत घरांची व्यवस्था केली जाईल. या प्रकल्पात मजबूत आणि स्वस्त घरे खास तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जातात. या प्रकल्पात, बीम-कॉलम आणि पॅनेल कारखान्यामधूनच तयार करून घर निर्मितीच्या ठिकाणी आणले जातील. या सुविधेमुळे बांधकाम कालावधी आणि प्रकल्पाचा खर्च कमी होईल. या प्रकल्पांतर्गत तयार केलेली घरे पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असतील. तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर लाईट हाऊस प्रकल्पात दिसून येईल, ज्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केला जाईल. लाईट हाऊस प्रकल्पासाठी त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची निवड झाली आहे.