ऑनलाईन टीम / पटना :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी बिहार सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
भारत-चिनी सैन्याच्या संघर्षात 15 आणि 16 जूनला भारताचे 20 जवान शहीद झाले. यामध्ये बिहारच्या 5 जवानांच्या समावेश होता. बिहारमधील पाच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बिहार सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला बिहार सरकारकडून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (सहरसा), अमन कुमार (समस्तीपुर), जयकिशोर (वैशाली) आणि सुनील कुमार (पटना) अशी बिहारमधील शहिदांची नावे आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करून या जवानांना गुरुवारी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी मदतीची घोषणा करण्यात आली.