आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर : शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्यही महत्त्वाचे : निर्णय घेण्यापूर्वी साधक-बाधक विषयांवर करणार चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
मुलांच्या सुरक्षिततेला सरकार प्रथम प्राधान्य देत असल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सध्याच्या परिस्थितीत शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही घाई राज्य सरकारला नाही. पण, एकीकडे शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची मागणीही होत आहे, असे त्यांनी सांगितले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारला शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणतीही घाई नाही. कारण हा एक सुक्ष्म विषय आहे. जसे मुलांना शिक्षण महत्त्वाचे आहे, तसे त्यांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी साधक-बाधक विषयांवर चर्चा करूनच योग्य निर्णय घेतला जाईल. मुलांना सध्या कोरोनाची बाधा होण्याची शक्मयता अधिक असल्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा पुढील विचार करणे महत्त्वाचे आहे. तसेच बालरोगतज्ञ, डॉक्टर, परिचारिकांची नेमणूक करण्यात येणार असून याला काहीवेळ लागणार आहे, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
आम्ही मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असून कोणत्याही दबावाखाली शाळा-महाविद्यालये सुरू करणार नाही. राज्याची स्थिती व कोरोना बाधितांचे प्रमाण याचा अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. तज्ञ समितीकडून देणाऱया अहवालावर सर्व निर्णय घेतले जातील. दर 14 दिवसाला एकदा तांत्रिक सल्ला समिती आणि अधिकारी बैठक घेत आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सरकारकडे अहवाल सादर होत आहे. त्या अहवालांच्या आधारावरच सरकार योग्य तो निर्णय घेईल. कोणताही दबाव आला तरी घाईगडबडीने निर्णय घेण्यात येणार नाही, असेही डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
लसीकरणात भारताने जगात विक्रम निर्माण केला आहे. सोमवारी एकाच दिवशी देशात 84 लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कर्नाटक देशात सर्वाधिक लोकांना लसीकरण करणारे दुसरे राज्य आहे, असे सांगत त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समिती शाळा सुरू करण्याबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारावरच मुख्यमंत्री येडियुराप्पा सल्ला समितीच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. मुलांच्या भविष्यासह त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकार योग्य निर्णय घेणार आहे. यासाठी अनेकवेळा चर्चा होणार आहे. काही सुक्ष्म विषयांबाबत घाईगडबडीने निर्णय घेणे योग्य नव्हे, असेही त्यांनी सांगितले.
जागृतीमुळेच अधिक लसीकरण
राज्यात सोमवारी 7 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण, दिवसभरात 11.22 लाख जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आम्ही नागरिकांमध्ये लसीबाबत जागृती केल्यानेच आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे, असेही डॉ. सुधाकर यांनी सांगितले.