वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामीळनाडू संघातील एम शाहरूख खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आर.साई किशोर यांची विंडीजविरूद्ध होणाऱया मर्यादित षटकांच्या सहा सामन्यांसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
विंडीजचा संघ भारताच्या दौऱयावर येत आहे. उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जातील. 10 फेब्रुवारीला वनडे मालिकेला अहमदाबादमध्ये प्रारंभ होईल. त्यानंतर टी-20 मालिका कोलकातामध्ये खेळविली जाणार आहे.
तामीळनाडू संघातील शाहरूख खान आणि साईकिशोर यांच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून येत आहे. तामीळनाडू संघाच्या विजयामध्ये या दोन्ही क्रिकेटपटूंचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे. सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत तामीळनाडूने अजिंक्यपद मिळविताना अंतिम सामन्यात कर्नाटकाचा पराभव केला होता. या अंतिम सामन्यात शाहरूख खानची कामगिरी दर्जेदार झाली. तसेच साईकिशारने या सामन्यात 3 गडी बाद केले होते. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकविरूद्ध तामीळनाडूच्या शाहरूख खानने 39 चेंडूत 79 धावा झोडपल्या होत्या.