कळप बालिंग्याच्या पुढे गेल्याचा वनविभागाचा दावा, रात्री पुन्हा शोध मोहीम
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरानजीकच्या फुलेवाडी परिसरातील सुतारमळा परिसरात रस्त्यावर शुक्रवारी रात्री आढळलेला गव्यांचा कळप शिंगणापुरातून बालिंगाच्याही पुढे गेला असून शिंगणापूर पुलानजीक गव्यांच्या पायाचे ठसे आढळले. नागरी वस्ताला आता धोका नाही असा दावा रेस्क्यू टिमने केला आहे. दहा जणांची टिम त्यांच्या मागावर आहे. चार ते पाच गव्यांचा कळप असल्याची माहिती पुढे आली आहे. शनिवारी रात्री पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे करवीरचे वनअधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री फुलेवाडीजवळ गव्यांचा मुक्त संचार दिसल्याने या परिसरात घबराट पसरली होती. अग्निशमन दल, वन विभागातील कर्मचाऱयांनी गवे आढळून आलेल्या परिसराची पहाणी केली. दरम्यानच्या काळात गवे नजरेआड झाले होते. रात्री शोध मोहीम राबविण्यात आली. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत शोध कार्य सुरु होते. शिंगणापूरपर्यंत गव्यांचा माग काढण्यात रेस्क्यू टिमला यश आले. नदी पात्राजवळून बालिंगा गावापर्यंत माग मिळाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस, अग्निशमन दल व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेचे सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. वेगवेगळ्या चार पथकांनी रात्रभर या गव्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास एका पथकाला शिंगणापूर पुलानजीक या कळपातील गव्यांच्या पायाचे ठसे मिळून आले. तसेच या हालचालीही अत्यंत ताज्या असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले. शनिवारी रात्री पुन्हा ही शोध मोहिम सुरु करण्यात येणार आहे.
नागरीकांनी घाबरु नये
गवे शहारापासून दूर गेले आहेत. नागरी वस्तीला धोका नाही. नागरीकांनी घाबरु नये. वन विभाग गव्यांच्या मागावर आहे. त्यांच्या मूळ वास्तव्यापर्यंत त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
विजय पाटील, वन अधिकारी करवीर