शंभर वर्षाचे आयुष्य लाभणे आणि ते शिवमय असणे असे भाग्य क्वचितच कुणाच्या वाटय़ाला आले असेल आणि अशी व्यक्ती ज्या महाराष्ट्र देशाला व मराठी जनास लाभली ते त्याहून भाग्यवान म्हणायला हवेत. चतुरस्त्र प्रतिभा आणि व्यासंग असणारे बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरूवारी 29 जुलै रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. पुण्यात त्यांच्या शतकपूर्ती वाढदिवसाचा अभीष्टचिंतन सोहळा झाला. 99 दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. रांगोळय़ा काढण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाल, पगडी देत पायावर डोके ठेवून त्यांना वंदन केले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एका शिवशाहीराच्या वाढदिवसाचा देदीप्यमान इतिहास नोंदला गेला. बाबासाहेब पुरंदरे हे केवळ इतिहासकार नाहीत ते चतुरस्त्र, प्रतिभासंपन्न, सरस्वतीपुत्र आहेत. ओजस्वी वक्ते आहेत. छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या जीवनाचा ध्यास आणि श्वास बनले आहेत म्हणून वयाच्या शंभरीतही ते शिवछत्रपतींची गाथा आणि इतिहास सांगतात आणि सर्वांना भारावून सोडतात. त्यांचे अवघे जीवन शिवमय झाले आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पण ते इतिहास भूषण आहेत. शिवशाहीर आहेत. आपली वाणी, लेखणी, प्रज्ञा त्यांनी शिवमय केली आहे. ओघानेच त्यांना कोणत्याही पदवी वा पुरस्कारापेक्षा जनतेने दिलेला ‘शिवशाहीर’ हा पुरस्कार महत्त्वाचा व भूषणावह आहे. कोरोनाची साथ नसती तर बाबासाहेबांचा शंभरावा जन्मदिवस हा महाराष्ट्र सोहळा झाला असता आणि सगळे गड, किल्ले, ऐतिहासिक इमारती सजल्या असत्या, मोहरल्या असत्या व इतिहास प्रेमी शिंग-तुताऱया, ढोल-नगारे वाजवत त्या सोहळय़ात सहभागी झाले असते. बाबासाहेबांची कामगिरी आणि जीवननिष्ठा त्या योग्यतेची आहे. बाबासाहेबांनी वडिलांकडून प्रेरणा व संस्कार घेऊन वयाच्या आठव्या वर्षापासून इतिहासप्रेम आणि शिवप्रेम काळजात जपले आणि त्यांचा हा व्यासंग हळूहळू वाढत गेला. अनेक गावे, किल्ले, वाडे, दप्तरे, इतिहास मंडळे, पुराभिलेखांची कार्यालये, स्मारके, समाध्या, इतिहास पुरूषांचे वारसदार यांना अनेकवेळा भेटी देऊन ते अभ्यास करत आले आहेत. त्यांची अभ्यासयात्रा व छत्रपती शिवाजी या मंत्राचा जागर भारतभर अखंड सुरू आहे. आज देशात आणि महाराष्ट्रात एक दोन पिढय़ा अशा आहेत ज्यांनी छत्रपती शिवराय बाबासाहेबांच्या वाणीतून ऐकला. लेखणीतून समजावून घेतला. बाबासाहेबांना हे ज्ञान व अधिकार फुकाफुकी प्राप्त झालेला नाही. त्यांनी चालत, घोडय़ावरून, सायकलवरून, बैलगाडीतून जमेल तसा प्रवास करत शिवरायांचा अभ्यास केला आणि शिवराय गावोगावी गायला. विविध भाषा आत्मसात केल्या. त्यासाठी शं. ना.जोशी, ग. वा. खरे यांच्यासारखे गुरु केले. त्यांची ही धडपड आणि उत्साह आजही सुरू आहे. ही तपश्चर्या अनमोल, अनोखी, आदरणीय आहे. ती कुणालाही सहजी शक्य नाही म्हणूनच या शिवशाहीराला, राष्ट्रभक्ताला आणि सरस्वतीपुत्राला मानाचा मुजरा आणि तमाम वाचकांच्यावतीने इतिहाप्रेमींच्यावतीने आणि तरुण भारत परिवाराच्यावतीने अभीष्टचिंतन. बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासकार, लेखक असा लौकिक मिळवला. तसा वक्ते, नाटककार, रचनाकार, मार्गदर्शक, स्वयंसेवक, दानशूर अशीही थोरवी मिळवली आहे. ‘राजा शिवछत्रपती’ ही त्यांची साहित्यकृती आणि ‘जाणता राजा’ हे महानाटय़ मराठी माणूस कदापि विसरणार नाही. बाबासाहेबांचे ‘बेलभंडारा’ हे चरित्र कथन सहय़ाद्री प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. बाबासाहेब पुरंदरेंचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची सहज संवादी ओजस्वी वाणी. इतिहास म्हणजे सनावळय़ा, तह, अटी, जय-पराजय आणि वाद अशी समजूत असलेल्या समाजाला यातून थोडे बाहेर काढत त्यांनी सामान्यांना सोप्या भाषेत, रंजक शैलीने आणि ओजस्वी वाणीने इतिहास सांगितला. त्यामुळे तो अधिक भावला. सोपे दाखले, रंजक उदाहरणे आणि प्रेरणादायी इतिहास बाबासाहेबांनी महाराष्ट्राला शिकवला. शिवचरित्र ते जगभर सांगत फिरले ती त्यांची जीवननिष्ठा बनली. म्हणून शंभरावा जन्मदिवस साजरा होत असतानाही त्यांचा उत्साह, आनंद टिकून आहे. बाबासाहेबांची कामगिरी मोजता न येणारी आहे. त्यांचे शिवप्रेम तोलता न येणारे आहे. सहज आढावा घेतला तर ते सुमारे 80 वर्षे शिवचरित्र सांगत जगभर प्रवास करत आहेत. ‘राजा शिवछत्रपती’च्या 17 आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांनी ‘जाणता राजा’ चे 1200 प्रयोग केले आहेत. नाटक व व्याख्याने यातून उत्स्फूर्त मिळालेल्या पैशाचा त्यांनी तीन कोटीचा दानधर्म केला आहे. ओघानेच बाबासाहेबांची शतकपूर्ती वर्षभर साजरी होईल. पुण्यात भव्य रांगोळी काढून शतकपूर्तीचा बिगूल वाजला आहे. बाबासाहेबांनी मागे एकदा आपणास सव्वाशे वर्षे आयुष्य मिळाले तर शिवचरित्र ब्रम्हांडाच्या पलीकडे घेऊन जाईन असे म्हटले होते. तर शंभरावा जन्मदिवस साजरा करताना बाबासाहेबांनी ‘मी आनंदी आहे पण समाधानी नाही’ असे म्हटले. त्यांना शिवराय घराघरात, मनामनात पोहचवायचा आहे. त्यांच्यावर अलीकडच्या काळात टीकाही झाली. पण ते म्हणाले, ‘मला इतिहासकार म्हणू नका. मला काहीही म्हणू नका पण शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या’ राज ठाकरे यांनीही आज पुण्यात त्यांचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले. ‘बाबासाहेबांनी कधीच इतिहासाला धक्का लावला नाही. त्यांनी कधी दंतकथा सांगितल्या नाहीत वा लिखाणात दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही. ज्यांना जातीपातीवरून मतदान हवे असते, ज्यांना जातीयवाद पेरायचा, पसरवायचा व पोटे भरायची आहेत त्यांनी बाबासाहेबांना दूषणे दिली. पण बाबासाहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केले.’ राज ठाकरे यांनी योग्यवेळी टीकाटिप्पणीचा समाचार घेतला. आज आनंदाच्या, भाग्याच्या क्षणी हे सारे मागे टाकून आम्ही बाबासाहेबांचे अभीष्टचिंतन करतो. त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या सर्व इच्छाआकांशा पूर्तीसाठी प्रार्थना करतो.
Previous Articleआजचे भविष्य 30-07-2021
Next Article दरवर्षी 65 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी ‘मछली’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.