जुने अवशेष उघडय़ावर; धरणात गतवेळपेक्षा निम्म्याने पाणी
वार्ताहर/ कोयनानगर
कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाण्याची पातळी तळाशी गेली असल्याने धरणाच्या निर्मितीवेळी जलसमाधी मिळालेल्या अनेक गावातील घरे, मंदिराचे बांधकाम व जुने शिलालेख पाहायला मिळत आहे. हे जुने अवशेष पाहण्यासाठी अनेकजण धरण पाणलोट क्षेत्रात जात आहेत. या वर्षी जलाशयातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्याहून कमीच असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी 20 जून रोजी कोयनेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील पाणी साठा 39.35 टीएमसी होता. तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा हा अर्ध्याहून कमी म्हणजे 15.41 टीएमसी झाला असल्याने जलाशयातील पाणीसाठय़ाने धरणाचा तळ गाठला असल्याचे दिसत आहे. यामुळे जलसमाधी मिळालेली अनेक घरे, देवळे, जुने अवशेष उघडय़ावर आले असून अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेत आहेत. धरणातील पाणी पातळी खालावली असल्याने पाण्याखाली लपलेले आपले जन्म गाव, मूळ गाव पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेकजण धरणाकडे फेरफटका मारत आहेत. जलाशयातील पाणीसाठय़ात लक्षणीय घट झाल्याने धरण दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे.
105 टीएमसी पाणीसाठय़ाची क्षमता असणाऱया छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात 20 जून 2022 रोजी 15.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर गतवर्षी याच दिवशी धरणात 39.35 टीएमसी पाणी साठा होता. गतवर्षी धरण पाणलोट क्षेत्रात आजच्या दिवशी कोयनानगर येथे 45 (773) मिमी, नवजा येथे 63 (869) मिमी तर महाबळेश्वर येथे 64 (972) मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी आज 20 जून रोजी सकाळी कोयनानगर येथे 10 (48) मिमी, नवजा येथे 14 (51) मिमी तर महाबळेश्वर येथे 12 (60) मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तुरळक पावसाने आशा पल्लवित
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या नवजा, कामरगाव, किसरूळे अशा अनेक गावातील जनतेच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.