नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यरत नसलेल्या 111 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाने 2,100 राजकीय पक्षांविरोधात कारवाई सुरु केली होती. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 111 राजकीय पक्षांवर आरपी अधिनियम, 1951 च्या 29ए आणि 29सी नुसार कारवाई करण्यात आली आहे. या यादीत 2019 मध्ये निवडणूक न लढणाऱया पक्षांचाही समावेश आहे.
निवडणूक प्रक्रियामध्ये आणि व्यवस्थामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर ही कारवाई केली आहे. नोंदणी असणारे पण कार्यरत नसणाऱया 111 राजकीय पक्षांची मान्यता भारतीय निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. निवडणूक न लढता या पक्षांनी कोटय़वधी रुपयांच्या टॅक्समध्ये सूट घेतली होती. तसेच आर्थिक अनियमिततेसह वेळेवर वार्षिक लेखापरीक्षण अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. त्याशिवाय वार्षिक निवडणूक खर्चाचा लेखाजोखाही न देणे, असे गंभीर आरोप या राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाने लावले आहेत. त्याअंतर्गत 111 राजकीय पक्षांवर कारवाई केली. पक्षांनी राजकीय खर्चाचा हिशेब न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो.