खानापूर-हेम्माडगा मार्गावर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुलाची नितांत गरज
प्रतिनिधी /खानापूर
लोंढा-मिरज दुहेरी रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या मार्गात येणाऱया रेल्वे फाटकांजवळ यापूर्वीच भुयारी पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पण अद्याप खानापूर-हेम्माडगा राज्य मार्गावरील शडेगाळी गेटनजीक भुयारी पूल बांधण्यासाठी रेल्वे विभागातून अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही. यामुळे या ठिकाणी भुयारी पूल होणार की नाही, अशी शंका निर्माण होत आहे. पण या रस्त्याचे महत्त्व तसेच या मार्गाने गोव्याकडे होणारी वाढती वाहतूक लक्षात घेता शेडेगाळी रेल्वेगेटजवळ भुयारी पुलाची नितांत गरज आहे. रेल्वे विभागाने त्याही पुलाला मंजुरी द्यावी, अशी मागणी मणतुर्गा, नेरसा, शिरोली ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील जनतेने केली आहे.
खानापूर-हेम्माडगा-अनमोड रस्त्यामुळे बेळगाव-गोवा अंतर येता-जाता 38 कि. मी.नी कमी होते. यामुळे खानापूर-हेम्माडगा-अनमोडमार्गे गोव्याकडे जाणाऱया वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरच नेरसा, गवाळी, कोंगळा, पास्टोली, अशेकनगर, तेरेगाळी, तिवोली, शिरोली, डोंगरगाव, जामगाव, अबनाळी, हेम्माडगा, मेंडील, देगांव, पाली तसेच जोयडा तालुक्यातील जवळपास 20 गावांतून खानापूर-बेळगाव वाहतूक अवलंबून आहे. सध्या शेडेगाळी रेल्वेगेट लोंढा-मिरज मार्गावरील रेल्वेसाठी दिवसातून अनेकवेळा बंद करावे लागते. यामुळे बंद गेट उघडेपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागलेली असते.
आता कोरोना काळ तसेच दुहेरी मार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावर मोजक्याच रेल्वे तसेच मालवाहतूक गाडय़ा सुरू आहेत. पण दुहेरी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरून दिवसाकाठी जवळपास 25 रेल्वे व मालवाहतूक गाडय़ांची ये-जा सुरू होणार आहे. त्यातच विद्युतीकरणामुळे रेल्वेगाडय़ांचा वेगही वाढणार आहे. यामुळे दिवसातील बराच काळ रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार आहे. यामुळे दुहेरी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत शेडेगाळी गेटजवळ भुयारी पूल बांधणे अत्यंत गरजेचे आहे.
या मार्गावरील लहानसहान गावांकडे जाणाऱया मार्गांवरील रेल्वे फाटकांजवळ भुयारी पूल बांधण्यात आले आहेत. पण खानापूर-हेम्माडगा राज्य मार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील शेडेगाळी फाटय़ाजवळ भुयारी पूल बांधण्यात रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीच हालचाल का नाही, हेच समजू शकले नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी याची तातडीने दखल घेऊन या फाटकाजवळही भुयारी पुलाच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.
ऊस वाहतूक लक्षात घेऊनच पुलाचा आराखडा करावा
शिरोली, नेरसा, मणतुर्गा ग्रा.पं. कार्यक्षेत्रात उसाचे प्रमाणही अधिक आहे. या भागातील सर्व ऊस लैला शुगर्स, नलवडे शुगर्स, मलप्रभा साखर कारखान्यासह इतर कारखान्यांनाही जातो. हा सर्व ऊस याच मार्गाने साखर कारखान्यांना जातो. ऊस वाहतुकीसाठी या भागातील गावांना अन्य मार्ग नाही. यामुळे त्या रेल्वे फाटकाजवळ भुयारी पूल बांधताना तो कमीत कमी 20 फूट उंचीचा बांधावा, यामुळे त्यामधून ऊस भरलेला ट्रकही सहजासहजी पार होऊ शकतो.
इतर ठिकाणी बांधलेले भुयारी पूल 15 फूट उंचीचे आहेत. अशा पुलांतून केवळ टॅक्टरमधून ऊस वाहतूक होऊ शकते. पण यासाठी कारखान्याचे अंतर फार तर 25 कि. मी. राहणे गरजेचे आहे. पण लैला शुगर्स वगळता या भागातून इतर कारखाने कमीत कमी 40 कि. मी. अंतरावर असल्याने एवढय़ा लांब अंतरावर ट्रक्टरमधून ऊस पाठविणे शेतकरी व साखर कारखान्यांनाही परवडणारे नाही. याचा विचार करून आराखडा तयार करतानाच भुयारी पुलाची उंची 20 फूट ठेवण्याचीच त्यामध्ये तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.