कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मोदींचे मार्गदर्शन,तिकीट खरेदी करून मेट्रोतून प्रवास
वृत्तसंस्था/ कानपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कानपूर येथील आयआयटीच्या दीक्षांत सोहळय़ात भाग घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मेट्रोतून प्रवास केला आहे. पंतप्रधानांनी या प्रवासासाठी तिकीट देखील खरेदी केले. सुविधेसाठी शॉर्टकट अनेक जण सुचवतील. कम्फर्ट निवडू नका, आव्हाने स्वीकारा. जीवनात येणाऱया संकटांपासून पळ काढणारे लोक यशस्वी ठरत नाहीत. संकटांपासून दूर जाऊ नका, ज्या क्षेत्रात उतराल तेथे काही नवीन घडवा. सरकार प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत असल्याचे पंतप्रधानांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले आहे.
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तांत्रिक शब्दांचा खुबीने वापर केला. आयआयटीचे विद्यार्थी सातत्याने नवोन्मेष घडविण्यात मग्न असतात. या सर्वांदरम्यान तंत्रज्ञानाच्या युगात राहताना मानवी मूल्ये कधीच विसरू नका. रोबोट व्हर्जन व्हायचे नाही. इंटरनेटवर अवश्य काम करा, परंतु इमोशन्स कधीच विसरू नका. लोकांशी जोडले गेल्यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नवी ऊर्जा मिळेल. इमोशन दाखविण्याची वेळ आल्यावर तुमच्या मेंदूचा सर्व्हर फेल होऊन प्ttज् 404 दाखविणे, पेज नॉट फाउंड दाखविण्याचा प्रकार घडू नये असे मोदी म्हणाले.
तंत्रज्ञानाशिवाय जीवन आता अपूर्ण आहे. हे जीवन आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेचे युग आहे. तंत्रज्ञानात आयआयटीचे विद्यार्थी अवश्य पुढे जातील असा विश्वास आहे. तंत्रज्ञानापेक्षा वेगळय़ा असलेल्या गोष्टींनाही महत्त्व द्या. वेगवेगळय़ा क्षेत्रातील लोकांशी जोडण्यावर भर द्या. आगामी काळात तंत्रज्ञान वाढत जाईल. आयआयटी कानपूरने या विद्यार्थ्यांना दिलेले साहस पाहता त्यांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यापासून कुणीच रोखू शकत नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
खराब हवामानाचा अडथळा
तत्पूर्वी खराब हवामानामुळे पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकले नव्हते. त्यानंतर कारद्वारे पंतप्रधानांचा ताफा चकेरी विमानतळावरून आयआयटीमध्ये पोहोचले. विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
22 दिवसांत 7 वा दौरा
डिसेंबरच्या 22 दिवसांमध्ये पंतप्रधानांचा हा 7 वा उत्तरप्रदेश दौरा आहे. कानपूर-बुंदेलखंडमधील ही पहिली प्रचारसभा आहे. या क्षेत्रातील एकूण 52 पैकी 47 मतदारसंघांवर भाजपचा कब्जा आहे. भाजपचे हे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींकडून होतोय. मागील काही काळात या क्षेत्रात भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यापासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा यांनी अनेक जाहीरसभांना संबोधित केले आहे.