118 जणांना अटक : श्रीलंकेच्या पंतप्रधानांकडून घटनेची निंदा , निष्पक्ष चौकशीची मागणी
वृत्तसंस्था / लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात श्रीलंकन नागरिकाची झुंडीकडून झालेल्या हत्या आणि मृतदेह जाळण्याप्रकरणी 800 हून अधिक लोकांवर दहशतवाद फैलावल्याचा गुन्हा नोंदवून 118 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 13 प्रमुख आरोपी सामील आहेत. तर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी या क्रूर घटनेची कठोर शब्दांत निंदा करत पाकिस्तानचे पंतप्रधान दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. राजपक्षे यांनी याचबरोबर पाकिस्तानात राहत असलेल्या स्वतःच्या देशाच्या अन्य नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
कट्टरवादी इस्लामिक संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) समर्थकांनी सियालकोट जिल्हय़ातील एका वस्त्राsद्योगावर शुक्रवारी हल्ला केला होता. ईशनिंदेच्या आरोपात जमावाने कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रियंता कुमार यांचा ठेचून जीव घेतला तसेच त्यांच्या मृतदेहाला रस्त्यावरच पेटवून दिले होते. 40 वर्षीय कुमारा 7 वर्षांपेक्षा अधिक काळापासून स्पोर्ट्स वियर तयार करणाऱया रजको इंडस्ट्रीजमध्ये काम करत होते.
कुमारा यांच्यावर एक धार्मिक पोस्टर फाडल्याचा आणि कचरापेटीत टाकल्याचा आरोप होता. या घटनेची माहिती हत्या आणि मृतदेह पेटवून दिल्यावर पोलिसांना मिळाली. आरोपींची ओळख पटविणे आणि त्यांची भूमिका निश्चित करण्यासाठी 160 व्हिडिओ फुटेज तपासण्यात आल्याचे पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक राव सरदार अली खान यांनी शनिवारी सांगितले.
पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस
सियालकोटच्या कारखान्यावर हल्ला आणि श्रीलंकन नागरिकाला जिवंत पेटवून देणे अत्यंत भीतीदायक आहे. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस आहे. मी स्वतः तपासावर देखरेख ठेवत असून दोषींना कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे.
सोशल मीडियावर संताप व्यक्त
पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाच्या जमावाकडून झालेल्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय. जगातील विविध भागांमधील युजर्सनी या घटनेची निंदा केली, तर श्रीलंकेत या प्रकरणी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.