नेत्रावळीयेथीलप्रगतशीलशेतकरीहर्षदप्रभुदेसाईयांचेमत
प्रतिनिधी/ सांगे
ऊसशेती आणि संजीवनी साखर कारखान्याचे सध्या तरी काही भवितव्य दिसत नाही. गोव्यातून ऊसशेती नामशेष होता कामा नये. ऊस हे नगदी पीक असल्याने अनेक शेतकऱयांचा चरितार्थ त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ नकारात्मक बाबींवर विचार न करता खासगीकरणातून कारखाना चालवावा, असे मत उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेले नेत्रावळी येथील प्रगतशील ऊस शेतकरी हर्षद प्रभुदेसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
कोणत्याही परिस्थितीत गोव्यातून ऊसपीक गायब होता काम नये. सरकारने केवळ नकारात्मक बाबी न पाहता ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे या दृष्टिकोनातून पाहायला हवे. गोव्यातील ऊसाला कमी उतारा मिळतो ही गोष्ट खरी असली, तरी तमिळनाडू, आंध खप्रदेश येथे देखील कमी उतारा मिळतो. मात्र तेथील साखर कारखाने खासगीरीत्या उत्तम प्रकारे चालतात, तर येथे का चालू शकत नाही, असा सवाल प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला. ऊसपीक हे पर्यावरणाला साहाय्य करणारे असून कार्बन डायऑक्साईट नष्ट करणारे आहे. त्यामुळे समजा ऊसपीक गायब झाले, तर प्रदूषण वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
खासगीरीत्या कारखाना चालविण्यास मान्यता द्यावी
खासगीरीत्या कारखाना चालविण्यास मान्यता द्यावी. सरकारने तसा प्रस्ताव मागवावा. केवळ कायद्यावर बोट ठेऊन किंवा कुरापती काढून काहीच फायदा नाही. खासगीकरणाचा उपाय केल्यास ऊस उत्पादन वाढू शकते. आजपर्यंत ऊस उत्पादक वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सरकारने केलेले नाहीत. यापूर्वी दोन-तीन समित्यांची स्थापनाही करण्यात आली, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही, याकडे प्रभुदेसाई यांनी लक्ष वेधले.
धरणग्रस्तांसाठी ऊस हेच नगदी पीक
साळावली धरणग्रस्तांकडे एकच 10 हजार चौरस मीटरचा भूखंड असून 90 टक्के धरणग्रस्त नगदी पीक म्हणून ऊसाची लागवड करत आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. ऊसाची मशागत व इतर मजुरीची कामे हे लोक आपल्या कुटुंबातील लोकांकडून करून घेतात. त्यामुळे मजुरीचा पैसा घरातच राहतो व नफ्यामध्ये वाढ होते. या लोकांसाठी ऊस हेच एकमेव नगदी पीक आहे. सध्या पर्यटन व्यवसाय थंडावलेला आहे. खनिज खाणी बंद आहेत. त्यातच साखर कारखान्याचा गाशा गुंडाळला, तर पुढे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पूर्वी व्हायचे गुळाचे उत्पादन
खाण पिटातील पाणी खेचून सरकारने ते शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे व शेती करू पाहणाऱया होतकरू तरुणांना प्रोत्साहित करावे, अशी मागणी प्रभुदेसाई यांनी केली. संजीवनी साखर कारखाना होण्यापूर्वीपासून आम्ही ऊसाची लागवड करून गुळाचे उत्पादन घेत होतो. तयार झालेला गूळ सांगली, कोल्हापूर येथे विक्रीस पाठविला जात होता. यापूर्वी 2 हजार टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेतलेले आहे. आता हा आकडा 800 पर्यंत आला आहे. याला केवळ परिस्थिती जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
गूळनिर्मिती प्रकल्प उभारावा
ऊसपिकाला रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत नाही. दुसरीकडे सुपारी पिकाला रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागते. नारळाच्या पिकाला माईट रोग जडण्याचे व बडरॉट रोगाने माड मृत होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, याकडे प्रभुदेसाई यांनी लक्ष वेधले. यंदा चांगल्या हवामानामुळे व पाण्याची टंचाई न भासल्याने गोव्यातून 40 ते 42 हजार टन ऊसाचे उत्पादन येण्याची शक्मयता आहे. गेल्या वषी हा आकडा 32 हजार टनांच्या आसपास होता. गोव्यातील ऊसपीक सरकारने राखून ठेवावे. संजीवनी परवडत नाही म्हणून बंद करण्याच्या मुद्यावर सारासार विचार होणे गरजेचे आहे. मुळात संजीवनी अस्तित्वात येण्यापूर्वीपासून शेतकरी ऊसाची लागवड करून गुळाचे उत्पादन घेत होते. आता देखील सरकारने गूळनिर्मिती करणारा एखादा प्रकल्प उभारून ऊसापासून गूळ तयार करावा, असेही प्रभुदेसाई यांनी सूचविले. अद्याप सरकारने यावषीच्या ऊसाचे काय करणार हे स्पष्ट केलेले नाही. एकूणच यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.