ऑनलाईन टीम / मुंबई :
लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग म्हणजेच संभाजी महाराजांच्या हत्येचे भाग दाखवू नये अशी विनंती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र, ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वतः अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, गेली दोन वर्षे मालिका सुरू आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतू मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल!