ऑनलाईन टीम / पुणे :
देशाची अन्नधान्याची गरज वाढत असल्याने आपण उसाचे क्षेत्र वाढवू शकत नाही. त्यामुळे उसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधन क्षेत्रात गुंतवणूक होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने आयोजित दुसऱया आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘शाश्वतपणा ः साखर तत्संबंधित उद्योगात वैविध्यपणा आणि नाविन्यपूर्णता’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंधारणमंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मृदूसंधारणमंत्री शंकरराव गडाख, पंजाबचे सहकारमंत्री सुखवींदरसिंह रंधावा, युकेच्या आंतराष्ट्रीय साखर संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ओरिव्ह यांच्यासह 22 देशातील साखर उद्योगातील तज्ञ उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशातील उसाचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. 2025 पर्यंत देशातील साखरेची मागणी 300 ते 330 लाख टनापर्यंत गेलेली असेल. मात्र, देशात सध्या अन्नधान्याची गरज वाढत आहे. उसाखालचे क्षेत्र आपण वाढवू शकत नाही. त्यामुळे हेक्टरी 250 टनांपर्यंत उसाचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. सध्या 10.5 टक्क्यांपर्यंत असलेला उतारा 11.5 ते 12 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी संशोधन संस्था आणि शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा. सध्याची साखर उद्योगातील संशोधनातील गुंतवणूक फारच तोकडी आहे. भविष्यात संशोधनात गुंतवणूक वाढवली नाही, तर साखर, इथेनॉल आणि सहवीज याची मागणीही अपुरी पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.