नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनापूर्वी 16 आणि 17 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींशी चर्चा करून सर्वपक्षीय बैठकांचे नियोजन केले आहे.
येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 16 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी संध्याकाळी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. नायडू यांनी 17 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता बैठक बोलावली असून अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्षांचा पाठिंबा मागितला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत असल्याने त्यांचे हे शेवटचे अधिवेशन असेल. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधक या दोघांनीही अद्याप उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.