वाळपई / प्रतिनिधी
गोव्यातील इंग्रजी शाळांना अनुदान देऊन भाजपा सरकारने कोकणी व मराठीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे जोपर्यंत कोकणीचे अनुदान बंद करत नाही, तोपर्यंत भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलन कायम राहणार आहे. आज या सरकारला खरोखरच अद्दल घडवायची असेल तर मराठी व कोकणी प्रेमींनी एकसंध होऊन सरकारच्या विरोधात निर्माण करणाऱया आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.
भाषा सुरक्षा मंच यांच्यावतीने वाळपई बाजारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपा सरकारवरकडाडून टीका केली. याप्रसंगी व्यासपीठावर ऍड. शिवाजी देसाई, शांती मणेरकर व भाषा सुरक्षा मंचच्या इतर पदाधिकाऱयांचा समावेश होता. सुभाष वेलिंगकर यांनी, 2012 ते 2020 पर्यंत भाजपा सरकारने सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे आता मराठी व कोकणी भाषाप्रेमीनी जागृत होणे गरजेचे आहे. येणाऱया काळात इंग्रजी शाळांना देण्यात आलेले अनुदान बंद न केल्यास आपल्या सांस्कृतिक मूल्यावर मोठा घाला घालण्याचा प्रयत्न या सरकारकडून होणार आहे. याची सुरुवात झालेली आहे. यामुळे भविष्यातील आपल्या पिढीचा सारासार विचार करून नागरिकांनी या आंदोलनामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊन सरकारला अद्दल घडविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना ऍड. शिवाजी देसाई यांनी, इंग्रजी शाळा सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेऊन आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून मराठी व कोकणी संस्कृतीची मोठी हानी होताना दिसत आहे. येणाऱया काळात आपली संस्कृती खरोखरच टिकवायची असेल तर भाषा सुरक्षा मंचने पुकारलेल्या आंदोलनामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव व हेवेदावे न ठेवता सर्वांनी एकसंघ होऊन हे आंदोलन मोठे करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सुरुवातीला सरकारच्या नावाने मोठय़ा प्रमाणात घोषणा देऊन या धरणे कार्यक्रमाला सुरुवात झाली. वाळपई नगरपालिकेच्या व्यासपीठावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत.
मंगळवार हा वाळपई शहराचा आठवडी बाजार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. भाषा सुरक्षा मंच या इतर पदाधिकाऱयांनी या प्रसंगी विचार मांडले.
सुरुवातीस भारत माता की जय अशा घोषणांनी या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. मोठय़ा प्रमाणात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी या धरणे कार्यक्रमाला घोषणा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.