ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आम्ही काम करत आहे. आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. आयोगाच्या मुख्य सचिवांनाही निवेदन दिले. मात्र, अजूनही आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, अशी मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
शहर स्वच्छ करण्याचे काम आम्ही करत आहे. हे काम करत असताना आम्हाला देण्यात येणारे वेतन अत्यंत कमी आहे. निवृत्तीनंतर कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध झाल्यानंतर विविध समस्यांना सफाई कर्मचाऱयांना तोंड द्यावे लागत आहे. संपूर्ण आयुष्य आम्हाला सफाई करण्यासाठी घालवावे लागत आहे. निवृत्तीनंतर पेन्शन नाही, अचानकपणे कामावरून कमी केले जात आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महापालिकेने आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले तर दिलासा मिळेल. यासाठी आम्ही वारंवार निवेदने दिली आहेत.आतातरी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष काशीराम चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुरली चव्हाण, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, जनरल सेक्रेटरी व्ही. आर. घटकांबळे, संजय भंडारी, निरज बनसकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.