मुस्लीम संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कुराण शरीफ हे शांततेचेच प्रतीक आहे. असे असताना त्याविरोधात याचिका दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सय्यद वासीम रिझवी यांनी केला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तंझीम-ई-उलमा-ई-हाले सुन्नत बेळगाव या संघटनेने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुराण शरीफमधील 26 आयएसमध्ये हिंसाचार असल्याचा खोटा दावा त्यांनी दाखल केला आहे. या 26 आयएसचा दुरुपयोग करून आतंकवादी फायदा घेत आहेत, असेदेखील याचिकेत म्हटले आहे. मात्र हे पूर्ण चुकीचे आहे. कुराणामध्ये अशा प्रकारे हिंसाचार नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यामुळे मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तेंव्हा सय्यद वासीम रिझवी यांच्यावर कलम 153ए आणि 296ए अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे. या याचिकेबद्दल आमचा तीव्र आक्षेप आहे. तेंव्हा संबंधित याचिकाकर्त्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मौलाना अलीहसन कादरी, ए. के. बागवान, आय. ए. मकानदार, एम. जे. मुजावर, एम. एम. शेख, एम. एच. पठाण, एन. एस. पटवेगार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.