सातारा / प्रतिनिधी
काही अपवाद वगळता जिह्यातील सर्व सरपंचांनी गावपातळीवर कोरोनाचा प्रसार निंत्रणात ठेवण्यासाठी अहोरात्र काम केले. परंतु मागील काही दिवसांमध्ये शासनाने सर्व क्षेत्रे खुली केल्यानंतर नागरिकांकडून काळजी घेताना दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले असून आता ग्राम कृती समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंचांनी पुन्हा एकदा प्रभावीपणे काम करण्याची वेळ आली आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
जिह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गाव पातळीवर कृती समिती गठीत करुन कामकाज पार पाडण्यासाठी आदेश करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षांची झुम मिटींग घेण्यात आली. या मिटिंगमध्ये 700 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक झुम मिटींगद्वारे उपस्थित होते. कार्यशाळेत सरपंच व ग्रामसेवकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, बहुतांशी ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्याने नवनियुक्त सरपंचांनी अधिक जोमाने कोरोना प्रतिबंधासाठी काम करावे. विशेष करुन मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे आदी सवयी कटाक्षाने पाळल्या जातील यासाठी सरपंचांनी गावामध्ये लोकांच्यामध्ये जनजागृती करावी. त्याचबरोबर लस घेतल्यामुळे कोणताही गंभीर दुष्परिणाम होत नसल्याचे समोर आल्याने 60 वर्षावरील नागरिकांनी व कोमॉर्बिडिटी असलेल्या 45 ते 59 वयोगटातील नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी, असे जिल्हाधिकार्यांनी आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, गावामधील 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची व 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींची नोंदणी करण्यासाठी ज्या नागरिकांना स्वतःहून ऑनलाईन नोंदणी करणे जमणार नाही, अशा नागरिकांची ग्रामपंचायत पातळीवर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नेंदणी करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा. गावामध्ये कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यास तातडीने त्याच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन घ्यावे. संशयित रुग्णांना क्वारंटाईन करणे भाग पाडावे, कोरोना बाधित परंतु लक्षण नसणार्या व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे. त्यांच्यावर ग्राम कृती समितीच्या माध्यमातून संनिंत्रण ठेवावे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी ग्रामस्तरीय कृती समितीची जबाबदारी सांगितली. गावपातळीवर समितीने कठोर निर्णय घेतले पाहिजेत. विशेष सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी समितीने धडाडीने कामकाज केले पाहिजे. दुकानांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. घंटागाडी व स्पिकरवर ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रसिद्दी देण्यात यावी, ग्राम कृती समित्यांनी वारंवार बैठका घेवून वेळोवेळी प्रशासनामार्फत देण्यात येणार्या सुचनांनुसार आपापाल्या गावांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे सांगितले.