अनेकांची घरे कोसळली विविध ठिकाणी घरांमध्ये शिरले पाणी, राष्ट्रीय महामार्गासह काही गावांच्या रस्त्यांवर अडकली वाहने बळ्ळारी नाल्याला तिसऱयांदा पूर, जनजीवन विस्कळीत, नागरिकांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसानंतर गुरुवारी दमदार पावसास प्रारंभ झाला. बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला. शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. अनेकांची घरे कोसळली. तर अनेकांच्या घरात पाणी शिरुन साऱयांची तारांबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचा लोंढा वाढल्याने काही वाहने भुतरामहट्टीजवळच अडकून पडली. त्यामुळे जणू ढगफुटीच झाल्याचा अनुभव नागरिकांना आला.
बुधवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. गुरुवारी पहाटे तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील ग्लोब थिएटरसमोर नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप निर्माण झाले होते. शहापूर येथील खडेबाजारमध्ये अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरुन दुकानदारांची तारांबळ उडाली. शहापूर येथील कचेरी गल्ली येथे घराची भिंत कोसळली तर कंग्राळ गल्ली येथेही एक घर कोसळले. खडेबाजार परिसरातही घर कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
पिके पाण्याखाली
हवामान खात्याने जोरदार पाऊस होणार असा अंदाज वर्तविला होता. पावसाने आपले रौद्ररुप दाखवून दिले. मार्कंडेय नदी दुथडी भरुन वाहू लागली तर कंग्राळी गावाजवळ असलेला जुना पूल पाण्याखाली गेला. मार्कंडेय नदीच्या काठावर असलेल्या जमिनीमध्ये पुन्हा पाणी शिरुन पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला.
दहावी विद्यार्थ्यांचा गुरुवारी शेवटचा पेपर होता. सकाळी 10.30 वाजता या परीक्षेला सुरूवात होणार होती. मात्र पावसाच्या कहरमुळे पालकवर्ग व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसात भिजतच परीक्षा केंद्रांवर आपल्या पाल्यांना सोडावे लागले. यामुळे पालकांना त्रास झाला. दीडच्या सुमारास पेपर संपणार असल्यामुळे भर पावसात भिजतच परीक्षा केंद्राच्या परिसरात मुलांची वाट पहावी लागली.
जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. फेरीवाले, बैठे व्यापारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने शहराकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे बाजारपेठेत काहीसा शुकशुकाट दिसून आला. कोरोनानंतर पावसाने कहर केल्यामुळे व्यापारीवर्ग हतबल झाल्याचे दिसले. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या तसेच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना छत्री तसेच रेनकोटचा आधार घ्यावा लागला. मात्र पावसाला इतका जोर होता की रेनकोट तसेच छत्रीचा काहीच फायदा झाला नाही. या वस्तू वापरुन देखील भिजतच खरेदी करावी लागली आणि माघारी फिरावे लागले.
जोरदार पावसामुळे गटारी तुडुंब भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत होते. मराठा कॉलनीमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. येळ्ळूर रोडवरील केशवनगर, अन्नपूर्णेश्वरनगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली. बळ्ळारी नाल्याकडे जाणारा मार्ग बुजल्यामुळे आनंदनगरसह इतर परिसरातून येणारे पाणी येळ्ळूर रस्त्यावर तुंबून होते. या पावसामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते. पाण्याला वाट करुन देण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. दरवेळीच हा फटका बसत आहे. त्यामुळे या परिसरातील नागारिक अक्षरशः हतबल झाले आहेत.
पावसाला अधिक जोर असल्यामुळे पाण्याचा लोंढा जोराने येत होता. गटारी व नाले तुडुंब भरुन वाहत होते. एकूणच या पावसाने साऱयांच्याच मनामध्ये धडकी निर्माण केली होती. पाऊस कमी होणार की नाही? याकडेच साऱयांचे लक्ष लागून आहे. यावषी पावसाचा लहरीपणाच दिसून येत आहे. सुरूवातीला दमदार मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर पावसाने दडी मागली. आता पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली. मात्र पाण्याला जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र शहरामध्ये दिसून आले.
बळ्ळारी नाला परिसरात तिसऱयांचा पूर
बळ्ळारी नाला हा शेतकऱयांना शाप ठरला आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी अनेकवेळा शेतकऱयांनी आंदोलने केली. स्वच्छता करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पहिल्या मान्सूननेच बळ्ळारी नाल्याच्या परिसराला पुराचा विळखा घातला. त्यामुळे भात पिके कुजून गेली. त्यानंतर पुन्हा शेतकऱयांनी दुबार पेरणी केली. आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने पेरणी केलेली भात पिके आणि लावणी केलेली भात पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱयांना दुसऱयांदा आर्थिक फटका बसला आहे.