कापोली येथे कायदा साक्षरता संदर्भात मार्गदर्शन : तालुका पातळीवर कायदा सेवा समिती कार्यरत
वार्ताहर / खानापूर
देशाला स्वतंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. परंतु सर्वसामान्य नागरिकांना अद्याप कायद्याचे ज्ञान नाही. त्यामुळे अनेक लोक कायद्याच्या अज्ञानामुळे भरडले जात आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी आता न्यायालयही प्रत्येकाच्या दारापर्यंत येत आहे. न्यायाधीशांमार्फत गावागावात जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी सरकारचे निर्देश आहेत. याच दृष्टिकोनातून प्रत्येक गावपातळीवर कायदा साक्षरता शिबिर आयोजन केले जात आहे.
वास्तविक, सामान्यांना कायद्याचे ज्ञान मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कायदा सेवा समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत सामान्यांना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचा लाभ घेत सर्वसामान्य नागरिकांनी कायदा आत्मसात करणे गरजेचे असल्याचे विचार खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी व्यक्त केले.
गुरुवारी कापोली येथे माऊली मंदिरात कायदा सेवा समिती तसेच खानापूर वकील संघटनेकडून ग्रामस्थांना कायद्याच्या ज्ञानाचे मार्गदर्शन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली ग्रामपंचायत अध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कापोली ग्रामपंचायत सदस्य यादू जोर्डेकर यांनी केले. वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी प्रास्ताविक करतानाच बालविवाह, कूळ कायदा, बालहक्क, शिक्षण हक्क, वारसा हक्क इत्यादी अनेक कायद्यांविषयी माहिती दिली. जेष्ठ वकील हिंदुराव देसाई यांनी ग्रामस्थांना जमीन खरेदी-विक्री याविषयी कोणती दक्षता घ्यावी ते सागितले. तसेच वकील आकाश अथणीकर, वकील एस. के. नंदगडी यांनीही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विलासराव देसाई, अमृत देसाई, रघुनाथ कुलकर्णी, बाळकृष्ण देसाई, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीव वाटुपकर यांनी केले. शाहू नांगनूरकर यांनी आभार मानले.