न्यायसंस्थेचे पावित्र्य राखण्याची केली सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयावर अनाठायी टीका केल्याच्या कारणास्तव सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी काही ज्येष्ठ वकिलांना धारेवर धरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्राणवायू पुरवठय़ासंबंधी सादर करण्यात आलेल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये सादर करण्यात आलेल्या याचिका सुनावणीसाठी आपल्याकडे घेतल्या असा आरोप या वकिलांनी केला होता. आपला आदेश नीट समजून न घेताच आपण टीका करत आहात. आपण न्यासंस्थेचे पावित्र्य बिघडवू नये, असे कठोर ताशेरे सरन्यायाधीशांनी या वकिलांवर ओढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू असणाऱया याचिका आपल्याकडे वर्ग करून घेतल्या आहेत. उच्च न्यायालयाने त्यांचे काम करू द्यायला पाहिजे, अशी टीका या वकिलांनी केली होती. तथापि, आम्ही कोणत्याही उच्च न्यायालयाच्या कामात आम्ही हस्तक्षेप केलेला नाही. तसेच या विषयांवरील याचिकांची सुनावणी करण्यापासून रोखले नाही. आम्ही स्वतःच देशातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारला विचारणा केली होती. आमचा आदेश व्यवस्थित वाचला असता तर बरे झाले असते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.
हरिष साळवे यांची माघार
ऑक्सजिन तुटवडय़ाची सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या प्रकरणात ज्ये÷ वकील हरिष साळवे यांची न्यायालयाच्या साहाय्यक वकिलाची किंवा ‘न्यायालय मित्र’ (ऍमिकस क्युरे) म्हणून नेमणूक केली होती. कोरोना प्रकरणातील सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी मध्यस्थाची भूमिका स्वीकारावी अशी सूचना करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची नियुक्तीही केली होती. मात्र या नियुक्तीवर सोशल मीडियात प्रचंड टीका झाल्यानंतर साळवे यांनी हे उत्तरदायित्व स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत त्यांना या कामापासून दूर होण्याची अनुमती दिली.