अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 30 नोव्हेंबर 2021, स. 11.15
● सोमवारी अहवालात फक्त 17 बाधित
● एकूण 1,503 जणांची तपासणी
● मृत्यू दराचा आलेख शून्यावर
● लसीकरण साडे 31 लाखांनजीक
● गर्दीतही नियम पाळण्याचे आव्हान
● नवीन व्हेरीएंट जिल्ह्यात नाही
सातारा / प्रतिनिधी :
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी देखील जिल्ह्याला दिलासा मिळाला असून गेली सलग तीन दिवस बाधित वाढीचा आलेख 20 च्या खाली आहे. 28 रोजी 17, 29 रोजी 14, आणि 30 रोजी 17 अशी अल्प बाधित वाढ समोर आलेली असून चार ते पाच तालुके कोरोना मुक्त झालेले आहेत. फक्त काही तालुक्यांमध्ये एक अंकी संख्येने नगण्य रुग्ण वाढ समोर येत आहे.
सोमवारी अहवालात 17 बाधित
प्रशासनाने सोमवारी सकाळी दिलेल्या मंगळवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा दिलासा मिळाला असून फक्त 17 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 1,503 जणांची नमुने तपासणी करण्यात आलेली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्के च्या खाली घसरलेला आहे.
मृत्यूदराचा आलेखही शून्यावर
गत आठवड्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खाली बसलेला असतानाच मृत्यू दराचा आलेखही शून्यावर आल्याने भीतीचे वातावरण कमी झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसात एकही मृत्यूची नोंद नाही तसेच उशिरा करण्यात येत असलेल्या नोंदीही होत नसल्याने मृत्यू दराचा आलेख खाली घसरलेला आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्याला ही स्थिती कोरोनामुक्तीकडे घेऊन जाणारी ठरत आहे.
गर्दीतही नियम पाळण्याचे आव्हान
इकडे जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडे शुन्याकडे जात असताना आणि सर्व वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा नवीन व्हेरीएंट आल्याच्या चर्चा घडत असून त्यासाठी पुन्हा सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार सातारा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा मास्क, सॅनिटायझर, हाताची स्वच्छता सुरक्षित सामाजिक अंतर नियम हे नियम पाळण्याचे आदेश देतानाच दंडात्मक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र आता गर्दीतही सुरक्षित अंतर पाळून मंदावलेल्या कोरोना संसर्गातील नियम पाळण्याचे आव्हान नागरिकांच्या समोर आहे. मात्र निदान दंडाच्या भीतीने तरी हे आदेश पाळावेच लागणार आहेत.
जिल्ह्यात नवीन व्हेरीएंट नाही
परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडून नवीन व्हेरीएंटचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र त्या अगोदरच राज्य सरकारने विमानतळांवर याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात सध्या परदेशातून कोणी आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी सातारा जिल्ह्यात नवीन व्हेरीएंट कोणीही रुग्ण निदान झालेला नाही. तसेच त्या अनुषंगाने प्रशासनाकडून अद्याप काही तयारी केेली नसली तरी नियम पाळण्याचेे आवाहन मात्र केले जात आहे. केवळ नियम पाळणेेेे हाच कोरोनावरील उपाय उपलब्ध आहे. तसेच लस घेतल्यास गंभीर धोका टळू शकतो.
लसीकरण साडे 31 लाखांनजिक
दैनंदिन 20 हजारांच्या पटीत सुरु असलेला लसीकरणाचा सोमवारी आणखी वेग चांगला वाढला होता. तब्बल 20 हजार 918 जणांनी लस घेतली असून यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 31 लाख 27 हजार 273 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 20 लाख 18 हजार 294 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 11 लाख 8 हजार 979 एवढी झालेली आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,98,813
एकूण बाधित 2,52,004
कोरोनामुक्त 2,44,458
एकूण मृत्यू 6,476
सक्रीय रुग्ण 233
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 14
कोरोनामुक्त 06
मृत्यू 00