सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी : दुबई कनेक्शनचा तपास व्हावा : मालमत्तांची चौकशी व्हावी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सलमान, आमिर आणि शाहरुख खानच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या तिन्ही खानांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे.
तिन्ही खानांना बाहुबली संबोधिणारा ट्विट त्यांनी केला आहे. बॉलिवूडचे तीन बाहुबली सलमान, शाहरुख आणि आमिर अखेर सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी गप्प का बसले आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
तिन्ही खान बाहुबलींच्या भारत आणि विदेशात विशेषकरुन दुबईत असलेल्या मालमत्तेची चौकशी केली जावी. या खानांना कुणी नजराण्याच्या स्वरुपात बंगले दिले? त्यांनी मालमत्ता कशी खरेदी केली? ईडी किंवा एसआयटी, आयटी आणि सीबीआयकडून या सर्व प्रकरणांची चौकशी केली जावी. खान बाहुबली कायद्यापेक्षा वरचढ आहेत का असे प्रश्नार्थक विधानही स्वामी यांनी केले आहे.
काही जण वगळल्यास पूर्ण बॉलिवूड मुके, बहिरे आणि आंधळे झाले आहे. अशा लोकांना गप्पच राहू द्या. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील, तेव्हा आम्ही आमचे सामर्थ्य दाखवून देऊ अशी प्रतिक्रया ट्विटरवर एका वापरकर्त्याने विचारला आहे.
ट्विटरवर समर्थन
खानांवर आरोप केल्यावर ट्विटर वापरकर्त्यांनी स्वामी यांच्या मागणीवर पाठिंबा दर्शविला आहे. संजय दत्त तुरुंगात गेल्यावर बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी त्याला समर्थन दर्शविले होते. परंतु आता त्यांच्यामधील एक असलेल्या सुशांतचा मृत्यू झाल्यावर कुणीच तोंड उघडत नाही. पूर्ण बॉलिवूड गँगचा धिक्कार असो अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने व्यक्त केली आहे.