वार्ताहर / कास :
दुर्गम बामणोली विभागातील अडतीस गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावातील लोकांनी एकत्र येत आज सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापन केली.
या विभागातील महत्वाचा प्रश्न असलेला कास माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करणे, तसेच सातारा बामणोली रस्ता कास पठारावरूनच चालू ठेवणे, व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे या समितीच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे.
समिती स्थापन करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करून सह्याद्रीनगर येथे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात आले. यावेळी बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, अंधारीचे उपसरपंच रविंद्र शेलार, कास संयुक्त व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत, घाटाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू काळे, दत्ता किर्दत, संतोष मालुसरे, दत्ता शिंदे, तुकाराम शिंदे, आपटीचे सरपंच बाबूराव शिंदे यांच्यासह अन्य लोक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रविंद्र शेलार म्हणाले, कास पठार ते सह्याद्रीनगर हा राजमार्ग दोन तीन वर्षांपासून बंद केला आहे. नेमका कोणत्या कारणास्तव हा रस्ता बंद केला हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. हा मार्ग खुला झाल्यास संपूर्ण जावली तालुक्याचा पर्यटन विकास होवून लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
राजेंद्र संकपाळ यांनी सातारा बामणोली रस्ता कास पठारावरूनच चालू करून डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करू असे सांगितले.कास समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी कास गाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले.