केवळ धार्मिक विधींचे आयोजन : प्रतापसिंह राणे
प्रतिनिधी / पणजी
उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध सांखळीच्या चैत्रोत्सवावर वाढत्या कोविडाचा यावर्षी देखील पुन्हा एकदा प्रभाव झाला असून यंदा चैत्रोत्सव केवळ धार्मिक विधीपुरताच मर्यादित राहील, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी जाहीर केले.
श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान विठ्ठलापूर सांखळी येथे वार्षिक चैत्र शुद्ध नवमीपासून सुरू होणारा चैत्रोत्सव यावर्षी रद्द झाल्यात जमा आहे. देवस्थानचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी देवस्थान समितीची बैठक बुधवारी घेतली आणि त्यात वाढत्या कोविडच्या फैलावामुळे राज्यातील भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावरील उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे चैत्रोत्सव झालाच नव्हता, यावर्षी तरी चैत्रोत्सव होईल, अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देवस्थान समितीने अखेर महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी घेतला. प्रतापसिंह राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ चैत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीची वार्षिक श्रींची पालखी आणि पौर्णिमेची पालखी हे धार्मिक उत्सव आयोजित करू, त्याचबरोबर देवस्थानचे जे पारंपरिक धार्मिक उत्सव आहेत ते सर्व आयोजित केले जातील, मात्र उत्सवातील दशावतारी नाटय़प्रयोग, वीरभद्र व देवस्थानच्या आसपासच्या परिसरात येणारी दुकाने व इतर सर्व कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे वरील चैत्रोत्सव काळात देवस्थानच्या परिसरात कोणीही गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.