सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज व कुपवाड शहर मनपा हद्दीतील कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये खंडित केलेल्या ३२ हजारांपैकी २८ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरळीत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणच्या सांगली शहर विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले, महापूराने शहर भागातील महावितरणच्या विद्युत प्रणालीची २ उपकेंद्रे, २८४ ट्रान्सफॉर्मर सेंटर्स, ११ उच्चदाब विजवाहिन्या आणि ३२,२९२ वीजग्राहक यांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडीत केलेला होता. सोमवार आणि मंगळवार अखेर दोन दिवसांत संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्यापैकी १ उपकेंद्र, २४५ ट्रान्सफॉर्मर सेंटर्स, १० उच्चदाब वाहिन्या आणि २७,९५६ वीजग्राहक यांचा विजपुरवठा पुन:श्च सुरु करण्यात आला आहे. पाणीपातळी आणखी कमी होताच टप्प्याटप्प्याने उर्वरीत ३९ ट्रान्सफॉर्मर्स व ४३३६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीतपणे चालू होईल.