वार्ताहर / भिलवडी
भिलवडी गाव संपुर्ण पूरग्रस्त म्हणून घोषित करुन सर्वांना तत्काळ मदत व सानुग्र आनुदान मिळाले पाहिजे अन्यथा भिलवडी येथील मागासवर्गीय समाजातील सर्व युवक व महिलांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीचा ताफा अडवून जाब विचारला जाईल असा इशारा माजी उपसरपंच मोहन तावदर (नाना) यांनी दिला आहे.
भिलवडी येथे आलेल्या महापूराची झळ शेतकरी, व्यापारी वर्ग अशा सर्वांनाच बसली आहे. तत्काळ मदतीच्या पंचनाम्यावेळी सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाचक अटी व कागदपत्रांची मागणी केल्याने अनेक पुरग्रस्त तत्काळ मदतीपासून वंचित राहत आहेत. अनेकांची घरे पडली आहेत. अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे कागदपत्र भिजलेली व पुरात वाहून गेली आहेत अशा ग्रामस्थांना मदत मिळणे कठीण झाले आहे. महापूरच्या या परिस्थितीमध्ये जाचक अटी व कागदपत्रांची मागणी न करता सर्वांचे पंचनामे होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार शासनाने करुन सर्वांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी मोहन तावदर यांनी केली आहे.