75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण, जत तालुका दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याबद्दल आनंद, जिल्हा परिषदेच्या 141 शाळांमधून ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम
सांगली / प्रतिनिधी
गरीबातील गरीब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह होती, तिसरी लाट यापेक्षाही गंभीर असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऑक्सिजन उलब्धतेच्या मर्यादेत रुग्णसंख्या रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना सर्वांनी मिळून काटेकोरपणे पाळूया, ऑक्सिजन क्षमतेपेक्षा रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज पडेल. त्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी समजून संपुर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितिन कापडनिस, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, विविध कार्यालय प्रमुख आदी उपस्थित होते.