वाठार किरोली / वार्ताहर :
वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. हा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, तसेच त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज रहिमतपूर येथे केले.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत रहिमतपूर नगर परिषदेने रहिमतपूर येथील गांधी मैदानावर माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत हरित सायकल महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री पाटील यांनी मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, तहसीलदार अमोल कदम, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, सुनिल माने, चित्रलेखा माने-कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, बेसुमार वृक्ष तोडीमुळे आज आपण निसर्ग निर्मित अनेक संकटांना सामोरे जात आहे. यापुढे प्रत्येकाने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापरही करु नये. कोरोना संसर्गाचे संकट काही प्रमाणात दूर झाले असले तरी नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे.
तर पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यातून वृक्ष लागवड व संवर्धन याबाबचे नागरिकांना महत्व पटवून देण्यात येणार असल्याचे रहिमतपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आंनदा कोरे यांनी सांगितले.